Corona Virus Third Wave: भारतात तिसऱ्या संभाव्य लाटेची भीती व्यक्त केली जात होती, ती तिसरी लाट आली आहे अशी चिन्हे दिसू लागली आहेत.
सगळ्या जगाला वेठीला धरलेल्या कोरोना विषाणूच्या साथीचा (Coronavirus Pandemic) विळखा दीड वर्षानंतरही सुटलेला नाही. कोरोना विषाणूच्या नवनव्या प्रकारांमुळे संसर्गाचा धोका कायम आहे. अनेक देशांमध्ये कोरोनाची तिसरी लाट (Corona Third Wave) आली आहे.
भारतात अद्याप दुसरी लाट (Second Wave) पूर्णपणे ओसरलेली नसतानाच, ज्या तिसऱ्या संभाव्य लाटेची भीती व्यक्त केली जात होती, ती तिसरी लाट आली आहे अशी चिन्हे दिसू लागली आहेत. तज्ज्ञांनी वर्तवलेला तिसऱ्या लाटेत मुलांना धोका असण्याचा अंदाजही खरा ठरत असल्याचं दिसत आहे.
कर्नाटक (Karnataka), पंजाब (Punjab), हरियाणा (Haryana) आणि हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) या राज्यांमध्ये शालेय विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं असून, त्यामुळं देशात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. आजतक डॉट इननं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
एकीकडे काही राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानं निर्बंध दूर केले जात असतानाच काही राज्यांमध्ये रुग्ण संख्या पुन्हा वाढत असून त्यात मुलांची संख्या अधिक आहे, ही चिंताजनक बाब आहे. कर्नाटकात सर्वात जास्त विद्यार्थ्यांना (Students) लागण झाल्याचं आढळलं आहे.
रुग्ण संख्या कमी झाल्यानं तिथं शाळा, कॉलेजेस सुरू करण्यात आली होती. बंगळुरूमध्येही शाळा, कॉलेज सुरू करण्यात आली; पण 6 दिवसांत 300 पेक्षा जास्त शालेय विद्यार्थ्यांना (School Students) कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं.
हा आकडा राज्यात सर्वांत जास्त असून त्यात वेगानं वाढ होत आहे. बेंगळुरू प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार, 5 ते 10 ऑगस्ट या काळात 0 ते 9 वर्षे वयोगटातील 127 तर 10 ते 19 वर्षे वयोगटातील 174 मुलांना कोरोनाची लागण झाली आहे.
हिमाचल प्रदेशात 62 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळं हिमाचल प्रदेश सरकारनं 22 ऑगस्टपर्यंत शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तर पंजाबमध्ये ऑगस्टच्या सुरुवातीला शाळा, कॉलेज सुरू करण्यात आली होती. तिथं 27 शाळकरी मुलांना कोरोनाची लागण झाल्यानं सरकारनं शाळांमध्ये कोरोनासंबधीच्या सुरक्षा नियमांच्या कडक अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत.
हरियाणामध्ये 2 ऑगस्टपासून 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू केले होते. मात्र तिथंही शाळांमध्ये काही विद्यार्थी कोरोनाबाधित आढळल्यानं सरकार पुन्हा कडक निर्बंध लागू करत आहे. लहान मुलांमध्ये संसर्गाचं प्रमाण वाढत असल्यानं शाळा, कॉलेजेस सुरू करण्याबाबत राज्य सरकारं फेरविचार करत आहेत.
देशात सध्या चार लाख रुग्ण उपचार घेत असून, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आदी राज्यांमध्ये पुन्हा रुग्ण संख्या वाढत असल्याचं दिसत आहे.