मुंबई, 11 जून: मागील काही दिवसांपासून नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी वेग पकडला आहे. कालपर्यंत मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्राला (Monsoon in Maharashtra) व्यापून पुढे वाटचाल केली. दरम्यान मागील आठवड्यापासूनच राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. मुंबईमध्ये मान्सूनने दिमाखात आगमन करत मुंबईकरांची पुरती तारांबळ उडवली आहे. असं असलं तरी अद्याप मुंबईकरांवरचं पावसाचं सावट कमी झालं नाही. आज मुंबईत काही प्रमाणात पावसाचा जोर ओसरला आहे. परंतु पुढील पाच दिवस मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आजपासून (11 जून) पुढील पाच दिवस राज्यातील विविध भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह ठाणे, पालघर, आणि कोकण पट्ट्यात पावसाचा जोर अधिक असेल असंही हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. याबाबतची माहिती हवामान तज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी आपल्या ट्विटमधून दिली आहे.
तर पुण्यात आजचा दिवस वगळता पुढील चार दिवस अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा यावर्षीचा सर्वात मोठा सलग पाऊस असणार आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हे ही वाचा- देशातील शास्त्रज्ञानं बनवलं पॉकेट व्हेंटिलेटर, कोरोना लढ्यात ठरणार महत्त्वपूर्ण आजपासून रायगड, मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर घाटावरील पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांनाही हवामान खात्याकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. याठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाला सज्ज राहण्याचा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. दुसरीकडे मराठवाड्यात नांदेड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद आणि लातूर या जिल्ह्यात पुढील आजपासून चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे.