खेड, 4 जुलै : रत्नागिरीत (Ratnagiri Rain) गेल्या अनेक तासांपासून तुफान पाऊस सुरू आहे. खेडमधील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याचं वृत्त समोर आलं आहे. 8 मीटर पेक्षा जास्त पातळीवरून नदी वाहत वाहत आहे. जगबुडीने धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर खेड शहरात पुराचे पाणी शिरल्याचं सांगितलं जात आहे. यानंतर तातडीने पाऊलं उचलली जात आहे. मच्छीमार्केटचा संपर्क तुटला असून नदी काठचा रस्ता पाण्याखाली गेला आहे. खेड शहरातील मच्छीमार्केट परिसरातली 15 ते 20 दुकानांमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे. प्रांत, डीवायएसपी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले असून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं जात आहे. याशिवाय खेड शहराला आणि नदीकाठच्या लोकांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. शहरात पुराचे पाणी शिरू लागले आहे. जगबुडी नदीतील गाळ न काढल्यामुळे शहरात पुराचा धोका वाढत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.
कोकणात मान्सून सक्रिय… राज्यात मान्सून पाऊस अनेक ठिकाणी पडत आहे तर काही भागात अद्यापही पावसाने दडी मारली आहे. संपूर्ण कोकणात येत्या 4 ते 5 दिवसात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील चार-पाच दिवस मान्सून कोकणात अधिक सक्रिय होणार आहे. मुंबई ठाणे व आजूबाजूच्या परिसरात येत्या 4 ते 5 दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.