मुंबई, 09 एप्रिल: सध्या महाराष्ट्रासह देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील कोरोना स्थिती अत्यंत गंभीर होत आहे. शासकीय रुग्णालयांसोबतच खाजगी रुग्णालयातही खाटांची कमतरता जाणवत आहे. राज्यातील डॉक्टर्स युद्धपातळीवर काम करत आहेत. राज्यात कोरोना विषाणूचे वाढते रुग्ण पाहता राज्यात लसीकरण मोहिमेला (Corona vaccination) वेग देण्यात आला आहे. पण अचानक महाराष्ट्रात लशींचा तुटवडा (Corona vaccine shortage in Maharashtra) जाणवत आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. एकीकडे कोरोना स्थिती बिकट बनत असताना राज्य सरकार आणि केंद्र सरकार वाद घालत आहेत. त्यामुळे या वादात रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होतं आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केंद्र सरकारच्या ढिसाळ कारभारावर ताशेरे ओढले आहेत. त्यांनी म्हटलं की, ’ ज्या लोकांना कोरोना लशीचा पहिला डोस दिला आहे, अशा नागरिकांना दुसरा डोस देणं आवश्यक आहे. अशा परिस्थित राज्यात लशीचा तुटवडा पडल्यानं नागरिकांमध्ये भीती वाढली आहे.’ ‘कोरोना प्रतिबंधक लशीच्या बाबतीत राज्याचा केंद्र सरकारशी पत्रव्यवहार झाला आहे. पण केंद्र सरकारची यंत्रणा सकारात्मक नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांचा हकनाक जीव जात आहे. पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना वेळेत दुसरा डोस मिळाला नाही, तर त्यांच्या मनात अनेक प्रश्न येत आहेत. लोकांची काळजी लक्षात घेऊन सरकारने तातडीनं सकारात्मक पावलं उचलणं गरजेचं आहे. आज 1 लाख 76 हजार लशी येणार आहेत. पण त्या लशीही अपुऱ्या पडणार आहेत. कारण दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्याच मोठी आहे,’ असंही महापौर म्हणाल्या. हे ही वाचा- कोरोना जोमात लसीकरण मात्र कोमात! तुटवड्यामुळे मुंबईसह अनेक भागात केंद्रच बंद लसीकरणाबाबत कोणतंही राजकारण करू नये. लोकांचा जीव वाचवायचा आहे. त्यामुळे लोकसंख्येच्या प्रमाणात राज्यांना लसीचं वाटप करण्यात यावं, अशी मागणीही महापौर पेडणेकर यांनी केली आहे.