वांद्रे, 19 मे : लॉकडाऊनमध्ये पुन्हा एकदा मुंबईच्या वांद्रे रेल्वे स्थानकावर हजारो कामगारांची गर्दी झाली होती. मुंबईमध्ये अडकलेल्या अनेक कामगार, मजूर आणि विद्यार्थ्यांनी ट्रेन गेल्यानंतर गर्दी केली होती. पोलिसांना याबद्दल माहिती मिळताच घटनास्थळी कामगारांना समजवून त्यांना घरी पाठवण्यात आलं आहे. पोलिसांनी संपूर्ण परिसर आता रिकामा केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या कामगारांना सोमवारी रेल्वे जाणार असल्याचं फोन करून सांगण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांनी वांद्रे स्थानकावर गर्दी केल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, पोलीस घटनास्थळी असून एवढ्या मोठ्या प्रमाणात कामगार कसे जमले याची तपास करत आहे.
आपल्याला स्थानिक पोलिीस स्टेशनमधून रेल्वे जाणारा असल्याचा फोना आला होता असा कामगारांचा दावा आहे. सहकारी कामगारांनी देखील टोकन क्रमांक असल्याचा दावा केला आहे. कामगार म्हणाले की, आदल्या दिवशी आम्हाला दोन फोन व मेसेजेस आले होते आणि वांद्रे स्थानकावरून आमच्यासाठी खास गाड्या चालवल्या जातील असं सांगण्यात आलं होतं. हे सर्व प्रवासी मजूर उत्तर प्रदेश आणि बिहारचे आहेत. दरम्यान, या कामगरांना खरंच पोलीस स्थानकातून फोन गेला होता की कोणी फसवणूक करत आहे. याचा अद्याप तपास लागलेला नाही. संपादन- रेणुका धायबर