मुंबई, 30 जून : एकनाथ शिंदे यांनी (CM Eknath Shinde) बंड केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये सत्ताबदल झाला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला लागल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आज मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. महाराष्ट्रामध्ये हा शपथविधी झाल्यानंतर लगेचच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांना आयकर विभागाची नोटीस आल्याचं राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी सांगितलं आहे. 2004, 2009, 2014 आणि 2020 च्या निवडणूक शपथपत्राबद्दल आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे, सत्ताबदलानंतर आलेली ही नोटीस हा फक्त योगायोग आहे का आणखी काही? असं ट्वीट महेश तपासे यांनी केलं आहे.
सरकार बदलल्यावर काय म्हणाले पवार? महाविकासआघाडीचे जनक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडावर प्रतिक्रिया दिली आहे. आमदार इतकी टोकाची प्रतिक्रिया देतील, असं वाटलं नव्हतं पण ते खरं ठरलं. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या लोकांना बाहेर पडायला प्रभावित केलं. गुवाहाटीला एवढे आमदार नेण्याची कुवत शिंदे यांनी दाखवली, असं पवार म्हणाले. एकनाथ शिंदे यांचं बंड आधी ठरलं होतं का याची मला कल्पना नाही, पण तयारी असल्याशिवाय हे झालं नाही. सगळ्या गोष्टी एका दिवसात घडू शकत नाही. उद्धव ठाकरे एखाद्यावर विश्वास टाकल्यावर पूर्ण जबाबदारी टाकतात, ज्यावेळी 39 लोक राज्याच्या बाहेर जातात तेव्हा त्यांचं मन परिवर्तन कसं करणार, असा सवालही पवारांनी उपस्थित केला.