मुंबई, 30 जून : कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्याला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर काँग्रेस व राष्ट्रवादीत वाद सुरू झाला आहे. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही शरद पवारांच्या वक्तव्यावर मोठं विधान केलं होतं. आता ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनीही यात वादात उडी घेतली आहे. आज झालेल्या एका पत्रकार परिषदेत नितीन राऊत म्हणाले की, ‘यशवंतराव चव्हाण हे संरक्षण मंत्री होते तेव्हा इंदिराजींनी 1971 चं युद्ध जिंकलं होतं, पण हे पवारांना आठवलं असते तर बरं झालं असतं. पवार हे काँग्रेसमध्ये तयार झालेलं नेतृत्व आहे. त्यांच्या मनात काँग्रेसबद्दल आपुलकी आहे, पण मग राहुल गांधींबद्दल ते तसं कोणत्या संदर्भात बोलले याबाबत माहिती नाही. खरं तर पवार यांनी नरेंद्र मोदींना प्रसार माध्यमांना सामोरं जायचा सल्ला द्यायला हवा होता.’ पुढे ते म्हणाले, पवार साहेबांनी विसरायला नको की 1962 च्या युद्धावेळी असलेली परिस्थिती वेगळी होती, देश शस्त्र सज्ज होता. मात्र आता परिस्थिती वेगळी आहे. ते संरक्षण मंत्री असताना त्यांनी काही चुका दुरुस्त केल्या असत्या तर बरं झालं असतं, असं म्हणत नितीन राऊतांनी शरद पवारांवर जोरदार निशाणा साधला. भारत आणि चीन सीमा रेषेवरील तणाव पूर्ण वादावरुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणी कुणी राजकारण करू नये, असा सल्ला दिला होता. त्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढी विरोधात काँग्रेसचे साताऱ्यात आंदोलन करण्यात आले. काँग्रेस कमिटी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवार यांच्या भारत-चीन प्रश्नी राजकारण न करण्याच्या मुद्द्यावर काँग्रेसची भूमिका स्पष्ट करत शरद पवार यांच्या व्यक्तव्यावर पलटवार केला आहे.