मुंबई, 12 एप्रिल: भाजपचे नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. किरीट सोमय्यांनी INS विक्रांत (INS Vikrant) युद्धनौकेचा निधी लाटल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणात माजी सैनिकाने तक्रार देखील केली आहे. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी अटक टाळण्यासाठी कोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र, हा अर्ज कोर्टाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे आता किरीट सोमय्या आणि निल सोमय्या (Niel Somaiya) या पिता-पुत्रांवर अटकेची टांगती तलवार आहे. यावर आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pednekar) यांनी किरीट सोमय्यांवर हल्लाबोल केला आहे. प्रत्येकवेळी दुसऱ्यांवर बोटं दाखवून हातोडे घेऊन फिरत होता. आता नॉट रिचेबल का? असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे. आम्ही नेहमीच सांगतो की कागद आणि कायद्याची लढाई आहे. आपल्याकडे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे. त्या संविधानाप्रमाणे आपण लढू. मात्र, महाराष्ट्रात किरीट सोमय्या हे असं कॅरेक्टर तयार झालंय जे फक्त भोंगा घेऊन बोंबलतं, असा हल्लाबोल किशोरी पेडणेकर यांनी किरीट सोमय्यांवर केला आहे. हा कमळाचा चिखल गेला कोठे? प्रत्येकवेळी दुसऱ्यांवर बोटं दाखवून दाखवून हातोडे घेऊन फिरत होता. आता का नॉट रिचेबल झाला, असं म्हणत त्यांनी सोमय्यांवर टीका केली आहे. किशोरी पेडणेकरांचा सोमय्यांना सवाल माझा प्रश्न थेट आहे, की हा कमळातील चिखल गेला कोठे? असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी सोमय्यांना विचाराला आहे. अनेकांनी मला प्रश्न केला की भोंगा कोणाला झोपवू देत नाही. खरं म्हणजे ज्या भोंग्यांनी लोकांना झोपू दिलं नाही ते भाजपात गेले आणि आता शांत झोपले आहेत. याचा अर्थ किरीट सोमय्या भोंगा घेऊन बोंबलणार, मग सगळे जाऊन भाजपात विलीन होणार आणि नंतर दुसऱ्यांच्या मागे लागणार, असा टोला ही किशोरी पेडणेकर यांनी किरीट सोमय्यांना लगावला आहे. सोमय्या पिता-पुत्रांना मोठा झटका किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर काल सुनावणी झाली. त्या सुनावणीवर कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला. 11 हजार रुपयांचा जमवलेला निधी जमा केला नसल्याचं प्राथमिकदृष्ट्या निदर्शनास आलं आहे आणि त्यावरुन कोर्टाने किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. तर नील सोमय्या यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. कोर्टाच्या या निर्णयाविरोधात आम्ही आता हायकोर्टात दाद मागणार आहोत अशी माहिती किरीट सोमय्या यांच्या वकिलांनी दिली आहे. काय आहे प्रकरण? किरीट सौमय्या यांनी आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी मोहीम राबवली होती. आयएनएस विक्रांत राज्यातच राहावी यासाठी किरीट सौमय्यांनी पैसे जमा केले होतो. यासाठी त्यांनी पैसे जमा केले होते. पण जमा केलेले पैसे राज्यपाल कार्यालयात पोहचले नाहीत, अशी माहिती आरटीआयमध्ये उघड झाली. आरटीआय कार्यकर्ते उपाध्ये यांनी राज्यपाल कार्यालयाकडून मागवली माहिती होती. यात असे कोणतेही पैसै मिळाले नसल्याचं राजभवनाकडून स्पष्ट करण्यात आले. या प्रकरणी माजी सैनिक बबन भीमराव भोसले यांनी तक्रार अर्ज दाखल केला आहे. किरीट सोमय्या, निल सोमय्या आणि त्यांचे इतर साथीदार याविरुद्ध अर्ज केला आहे. INS विक्रांत ही युद्धनौका वाचवण्यासाठी, करोडोंचा अपहार केल्याचा आरोप केला आहे. 2013 मध्ये खासदार असताना निधी गोळा केल्याचा आरोप सोमय्यांवर करण्यात आळा आहे. किरीट सोमय्या यांनी राष्ट्राची आणि जनतेची फसवणूक केली आहे. त्यामुळे किरीट आणि निल सोमय्या या पितापूत्रांसह त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी बबन भोसले यांनी केली आहे. भारतीय नौदलातून निवृत्त करण्यात आलेली विमानवाहू युद्धनौका “आयएनएस विक्रांत’चा 60 कोटी रूपयांना लिलाव करण्यात आला. ‘आयएनएस विक्रांत’ या युद्धनौकेने 1971 सालच्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये मोलाची भूमिका बजावली होती. 1961 मध्ये नौदलात दाखल झालेल्या “आयएनएस विक्रांत’ची देखभाल करण्यास महाराष्ट्र सरकारने यापूर्वीच असमर्थता दर्शविली होती. ‘आयएनएस विक्रांत’चा लिलाव न करता या युद्धनौकेचे संग्रहालयात रूपांतर करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. लिलाव प्रक्रियेत आयबी कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने 60 कोटींच्या मोबदल्यात ‘आयएनएस विक्रांत’ खरेदी केली.