राहुल खंदारे/ सिंदखेडराजा, 10 सप्टेंबर : पुलवामा हल्ल्यातील शाहिद झालेले जवान नितीन राठोड यांच्या सिंदखेडराजा तालुक्यातील चोरपांग्रा गावात सध्या भर पावसाळ्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. गावाला गेल्या 17 दिवसानंतर ही नळाचे पिण्याचे पाणी मिळत नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये ग्रामपंचायत प्रशासनाच्या विरोधात रोष निर्माण झाला आहे. तत्काळ पाणी मिळाले नाही तर ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा महिलांनी दिला आहे. चोरपांग्रा गावासाठी शासनाने यापूर्वीच तब्बल 23 लाख रुपये खर्चून पाणीपुरवठा योजना पूर्ण केली आहे. त्यामध्ये विहीर, पाइपलाइन, नळ, पाण्याची टाकीसह सर्व सुविधा दिल्या आहेत. मात्र स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याने गावात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शर्यतीत भाग घेताना बोट उलटली; 12 वीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू, अंगावर काटा आणणारा VIDEO विहिरीला मुबलक पाणी असताना सुद्धा गावाला पंधरा ते वीस दिवस पाणी मिळत नाही. नागरिकांना गावाबाहेर जाऊन विहिरीतून पाणी काढून डोक्यावरुन पाणी आणावे लागते. यामुळे शेतीची कामे अडली आहेत. मजुरांना शेतात कामाला जाता येत नाही. शाळकरी मुलांना शाळा सोडून पाणी आणावे लागत आहे. अशा गंभीर समस्या पानी नसल्याने निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यापूर्वी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला पाणी मिळावे म्हणून वारंवार विनंती केली. मात्र ग्रामस्थांच्या मागणीकडे सुद्धा ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. जर पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर ग्रामस्थ हंडा मोर्चा काढणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. विशेष म्हणजे पुलवामा हल्ल्यातील शहीद झालेले जवान नितीन राठोड यांचं हे गाव आहे.