अमरावती, 19 एप्रिल: पालकमंत्री यशोमती ठाकूर (Guardian Minister Yashomati Thakur) याच अचलपूरमधील घटनेच्या मास्टरमाईंड असल्याचा खळबळजनक दावा भाजप नेते अनिल बोंडे (BJP leader Anil Bonde) यांनी केला आहे. अमरावती जिल्ह्यातील (Amravati district) अचलपूर शहरात (Achalpur town) दोन दिवसापूर्वी दोन गटांमध्ये हाणामारी झाली. रविवारी रात्री दुल्हा गेट परिसरातील झेंडा काढल्याचा वादावरून दोन समुदाय पुढे आल्याने तणाव निर्माण झाला होता. दरम्यान हिंसाचारातील मुख्य आरोपी भाजप पदाधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. भाजप शहराध्यक्ष अभय माथने (BJP city president Abhay Mathane) याला पोलिसांनी पुण्यातून (Pune) अटक केली आहे. यावर बोलताना अनिल बोंडे म्हणाले की, या दंगलीमागे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता नसून या जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर या खऱ्या मास्टर माईंड असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.
यशोमती ठाकूर यांचा सहभाग असल्यामुळेच त्या मोर्चामध्ये सहभागी असलेल्या मुस्लिमांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, असा आरोपही बोंडे यांनी केला आहे. नेमकी घटना काय? अमरावती जिल्ह्यातील अचलपूर शहरात रविवारी रात्री दुल्हा गेट परिसरातील झेंडा काढल्याचा वादावरून दोन समुदाय पुढे आल्याने तणाव निर्माण झाला होता पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन जमाव पांगविला. तर घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला असून पोलिसांनी अचलपूर परतवाडा या दोन्ही जुळ्या शहरात संचारबंदी (कलम 144) लागू करण्यात आली आहे. अतिरिक्त पोलीस कुमक सुद्धा बोलवण्यात आली आहे. कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी विनाकारण बाहेर न निघण्याचे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे. यादरम्यान दोन्ही गटात दगडफेक झाली असून काही वाहनांची तोडफोड सुद्धा झाली आहे. तर पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी अश्रूधूर सुद्धा सोडण्यात आलं.