औरंगाबाद, 3 ऑगस्ट : शिवसेनेमध्ये (Shivsena) बंडखोरी झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच निवडणूक होत आहे. मुख्य म्हणजे या निवडणुकीत ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिंदे (Eknath Shinde) यांच्यामध्ये सामना बघायला मिळणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये उद्या म्हणजेच गुरूवारी या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतीसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीत शिवसेना आणि शिवसेना शिंदे पुरस्कृत गट आपसात भिडणार आहेत. एकूण 17 सदस्यांसाठी मतदान होणार आहे, यात शिवसेनेचे 13 जागांवर पुरस्कृत उमेदवार आहेत तर बंडखोर शिवसेना शिंदे गटानेही 17 जागांवर पुरस्कृत उमेदवार उभे केले आहेत. भाजपनेही पुरस्कृत उमेदवार दिल्याने तिरंगी लढत होणार आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना जेष्ठ नेते चंद्रकांत खैरे आमदार अंबादास दानवे यांनी प्रचार यात्रा केली, तर बंडखोर शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनीही या निवडणुकीत आपलं लक्ष केंद्रित केलं आहे. शिरसाट यांच्याच औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदार ही निवडणूक होते आहे. उद्या सकाळी 7 वाजता मतदानाला सुरवात होणार आहे. शिवसेनेला एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाचा सर्वाधिक फटका मराठवाड्यामध्ये बसला आहे. शिवसेनेसाठी बालेकिल्ला असणाऱ्या मराठवाड्यातूनच सर्वाधिक आमदार शिंदे गटामध्ये गेले, त्यामुळे मराठवाड्यात शिवसेनेच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं. यानंतर आता पहिल्यांदाच औरंगाबादमध्ये निवडणूक होत आहे.