मुंबई, 3 जून : कोरोना व्हायरसनं देशभरात थैमान घातलेलं असताना अभिनेता अक्षय कुमार एका जाहिरातीचं शूटिंग केल्यामुळे खूप चर्चेत आला होता. त्याच्या या शूटिंगचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ज्यामुळे त्याला ट्रोल करण्यात आलं होतं मात्र अक्षय या शूटिंगसाठी सरकारची परवानगी असल्याचं स्पष्ट केलं होतं. आता या जाहिरातीचा व्हिडीओ समोर आला आहे. अक्षय कुमार स्वच्छ भारत अभियानाचा ब्रँड अँबेसिडर असल्यानं त्याला या जाहिरातीसाठी निवडण्यात आलं होतं. नुकतीच ही जाहिरात रिलीज झाली. अक्षय कुमार आणि दिग्दर्शक आर बाल्की यांनी तयार केलेल्या जाहिरातीतून एक खास मेसेज सर्वांना दिला आहे. PIB ने नुकताच या जाहिरातीचा व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला.
या जाहिरातीत एका गावाचा सेटअप दाखवण्यात आला आहे. ज्यात अक्षय कुमारचं नाव बबलू आहे आणि मास्क लावून तो कामावर जात आहे. लॉकडाऊन संपल्यावर तो कामावर जात असताना सरपंच त्याला विचारतात, लॉकडाऊन संपल्या संपल्या फिरायला चाललास का? हा व्हायरस अजून संपलेला नाही. यावर अक्षय त्याला सांगतो, फिरायला नाही सरपंचजी मी कामावर जात आहे. यावर ते सरपंच म्हणतात तुला भीती नाही का वाटत. यावर अक्षय सांगतो, सुरुवातीला खूप भीती वाटली पण मग लक्षात आलं की, जर नीट काळजी घेतली तर या व्हायरसची लागण आपल्याला होणार नाही. याशिवाय अक्षय या जाहिरातीत आरोग्य कर्मचाऱ्यांची मेहनत आणि सोशल डिस्टंसिंग बद्दल बोलताना दिसतो.