मुंबई, 19 सप्टेंबर : ‘नजरेत दया हृदयात माया कटेवरी हात विठ्ठलाचे चिपळीचा नाद मृदुंगाचा ताल वारकरी नाचती पंढरीचे’ सातशे वर्षांहून अधिक काळ अखंड निघणारी पंढरीची वारी हा महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातला एक चमत्कारच म्हणावा लागेल. दरवर्षी संतांची मांदियाळी वैष्णवांसह पंढरपुरी जायला निघते. विठूनामाचा गजर करत तल्लीन होऊन वैष्णव पायी पंढरपूरला जातात. वारीच्या या संपूर्ण प्रथेमागे खूप मोठा इतिहास आहे. पुंडलिक हा विठुरायाचा लाडका भक्त. वारीची ही प्रथा पुंडलिकानेच सुरू केली. पण त्याचा हा प्रवास खूपच खडतर होता. पुंडलिकाचा हा ११ दिवसांचा वारीचा प्रवास पूर्ण होऊ नये म्हणून कलीने त्याच्या मार्गात बरेच अडथळे आणले. या अडथळ्यांवर पुंडलिकाने कशी मात केली? त्याची वारी पूर्ण झाली का? पुंडलिकाच्या या खडतर प्रवासात विठ्ठलाने त्याला सहाय्य केलं का? या रोमहर्षक प्रवासाची गोष्ट ‘स्टार प्रवाह’च्या ‘वारी विठ्ठलाची’ या महामुव्हीमधून उलगडणार आहे. रविवारी विठुमाऊली मालिकेचा 3 तासाचा महामुव्ही एपिसोड दाखवला जाणार आहे. त्याचप्रमाणे पुंडलिकाची वारी का सुरू झाली? डोक्यावर तुळस का घेतली जाते? गंधाचा टिळा का लावला जातो? रिंगणाचे खेळ का खेळतात? अशा वारीतल्या परंपरांमागील कारणंही कळणार आहेत. विठुमाऊलीची निर्मिती महेश कोठारेंची आहे. पौराणिक मालिकांबद्दल त्यांना जास्त प्रेम आहे. त्यांची जय मल्हार तर सुपर हिट होती. भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या ‘विठ्ठला’ला माणूसपण चुकलेलं नाही. किंबहुना त्यामुळेच विठ्ठल सर्वसामान्य लोकांना आपला देव वाटतो. भक्तांची ही माऊली आजही एकटीच विटेवर उभी आहे,त्याची अर्धांगिनी त्याच्या बाजूला,पण त्याच्या सोबत नाही, कारण रखुमाई रुसली आहे. या मागची गोष्ट विठ्ठल-रुक्मिणी-सत्यभामा यांच्या प्रेमाची अनोखी कहाणी पाहायला मिळते. सलमाननं जागवली स्पेशल मुलांमध्ये ‘उमंग’