माझी तुझी रेशीमगाठ
मुंबई, 11 जानेवारी- झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती. या मालिकेने फारच कमी वेळेत प्रेक्षकांना भुरळ पाडली होती. त्यामुळेच मालिका सतत टीआरपी च्या शर्यतीत पुढे असायची. सध्या ही मालिका आपल्या शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. नुकतंच या मालिकेचा शेवटचा भाग चित्रित करण्यात आला. मालिकेतील मुख्य अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने आपल्या लास्ट शूटचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. जो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांवर आपली पकड निर्माण केली होती. मालिकेचा आगळावेगळा विषय प्रेक्षकांच्या पंसतीस उतरला होता. मालिकेत यश आणि नेहाची हटके केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. विवाहित मात्र पतीपासून विभक्त झालेली नेहा जिला एक छोटीशी परी नावाची मुलगीसुद्धा असते. तर गर्भश्रीमंत असणारा, उच्चशिक्षित यश यांची ही हटके लव्हस्टोरी होती. या मालिकेत यश आणि नेहाची मुख्य भूमिका अभिनेता श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहेरेने साकारली होती. तर परीची भूमिका मायरा वैकुळ या बालकलाकाराने साकारली होती. **(हे वाचा:** chala hawa yeu dya: ‘चला हवा येऊ द्या’ मधून ‘या’ प्रसिद्ध कलाकाराची एक्झिट; काय आहे कारण? ) यश आणि नेहाची फ्रेश जोडी प्रेक्षकांना फारच आवडली होती. तर आपल्या गोड अभिनयाने आणि बोलक्या स्वभावाने परीने सर्वांचं मन जिंकलं होतं. या तिघांना प्रेक्षक भरभरुन प्रेम देत होते. मात्र मालिका अचानक बंद होत असल्याचं ऐकून चाहते नाराज झाले आहेत. यापूर्वीही सप्टेंबरमध्ये मालिका बंद होत असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र नंतर असं काहीही होणार नसल्याचा खुलासा झाला होता. मात्र आता मालिका खरोखरच निरोप घेत आहे.
नुकतंच अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये अभिनेत्रीने शूटिंगचा शेवटचा दिवस असा उल्लेख केला आहे. यामध्ये प्रार्थना लाल रंगाच्या साडीमध्ये रस्त्यावर पळत येताना दिसून येत आहे. अभिनेत्रीच्या या पोस्टवरुन मालिकेचा शेवटचा भाग चित्रित झाला असल्याचं स्पष्ट होत आहे. याआधी बालकलाकार मायरा वैकुळने आपल्या शूटिंगचा शेवटचा दिवस असल्याचं सांगत व्हिडीओ शेअर केला होता.
मालिका बंद होत असल्याने या मालिकेचे प्रेक्षक आणि कलाकारांचे चाहते नाराज आहेत. मालिका बंद केली जाऊ नये यासाठी अनेकजण कमेंट्स करत मालिका सुरु ठेवण्याचे आवाहन करत आहेत. दरम्यान अनेकांनी आम्ही नेहा, यश आणि परीला प्रचंड मिस करणार असल्याच्या भावना व्यक्त करत आहेत.