गेली 5 दशकं मराठी माणसांच्या न्याय हक्कांसाठी लढणारी शिवसेना आता ठाकरेंकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेली आहे.
शिवसेना पक्षाची स्थापना कशी झाली, पक्षाला/संघटनेला शिवसेना हे नाव कुणी दिलं? त्यापाठीमागचा इतिहास काय आहे?
मार्मिकमधील लेखणीने, मैदानी सभांमधील भाषणांनी आणि व्याख्यानांमुळे मुंबईतील मराठी भाषिक लोक बाळासाहेब ठाकरेंच्या भोवती गोळा होत होते.
यावेळी प्रबोधनकार ठाकरेंनी बाळासाहेबांना वारंवार पक्षाबाबत, संघटनेबाबत काही विचार डोक्यात आहे का? असे विचारले.
भेटायला येणाऱ्या लोकांपैकी काही लोक पक्ष स्थापनेचा सल्ला देत असत. परंतु, हा सल्ला बाळासाहेबांनी झुगारून लावला.
मराठी जनतेचा रेटा आणि प्रबोधनकारांचा सल्ला विचारात घेऊन बाळासाहेब ठाकरे म्हणाले, लोकांना आपण नक्की एकत्र करूया. परंतु, पक्ष काढून नाही तर संघटना काढून.
त्यानंतर संघटना काढण्याचं नियोजन झालं. तिला प्रबोधनकारांनी स्वतःहून नाव सुचवलं शिवसेना.
बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी त्यांच्या चाहत्यांची गर्दी होऊ लागली. त्यांनी संघटना स्थापनेची घोषणा केली तो दिवस होता 19 जून 1966.
बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या घरातील लोकांच्या व निवडक सहकाऱ्यांच्या मदतीने शिवसेना उद्घाटनाचा सोहळा पार पडला.
यावेळी केवळ अठरा लोक हजर होते. त्यामध्ये ठाकरे कुटुंबीयातील चौघे स्वतः बाळ ठाकरे आणि त्यांचे दोन बंधू व प्रबोधनकार ठाकरे हजर होते.