मुलगी जन्मली आणि 30 घरांमध्ये समृद्धी आली
औरंगाबाद जिल्ह्यातील झोंड कुटुंबीयांनी घरात मुलीचं जल्लोषात स्वागत केलंय.
त्यांनी आपला आनंद साजरा करताना सामाजिक भानही जपलंय.
गावातील 30 मुलीचं टपाल कार्यालयात सुकन्या समृद्धी योजनेत खातं त्यांनी उघडून दिलं आहे.
कशी सुचली कल्पना?
प्रवीण झोंड हे मुळचे औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यातील गोळेगावचे आहेत.
टपाल कार्यालयात कामाला असलेले प्रवीण औरंगाबाद शहरातील टी पॉईंट परिसरातील म्हसोबा नगरमध्ये राहतात.
त्यांच्या पत्नी विद्या या शिक्षिका आहेत. त्यांना पहिला मुलगा आहे. त्यानंतर कन्यारत्न प्राप्त झाले.
आजही समाज मुलगी झाल्यावर नकारात्मक विचार करतो किंवा वंशाला दिवा म्हणून मुलगाच हवा असा हट्ट करतो.
या प्रकारच्या बातम्या मी वाचल्या आहेत. स्त्रीभ्रूण हत्यासारख्या घटनांमुळे माणुसकीवरचा विश्वास संपत चाललाय का? असा प्रश्न पडला होता.
ही नकारत्मकता संपवण्याचा आम्ही आमच्या पद्धतीनं प्रयत्न केला आहे, असं प्रवीण झोड यांनी सांगितलं.