उसाच्या दृष्टीने कोल्हापूर जिल्हा आणि परिसरात पोषक वातावरण असल्यामुळे बहुतांश शेतकरी आपल्या शेतात ऊस पिकच घेतात.
मात्र काही शेतकरी याला अपवाद ठरतात.
अशाच प्रकारे कोल्हापुरातील एक शेतकरी गेली काही वर्षे पारंपारिक ऊस शेतीला फाटा देत आपल्या शेतात वांग्याचे उत्पादन घेत आहे.
गेली काही वर्षे तो असे वांग्याचे उत्पादन घेऊन लाखोंचा नफा कमावत आहे.
कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली या गावी शेतकरी सुदर्शन जाधव राहतात.
त्यांच्याकडे असणाऱ्या एकूण नऊ एकर शेतीपैकी एकूण सात एकर बागायत जमीन, तर दोन एकर जिरायत जमीन असे शेती आहे.
तर याच शेतात जाधव कुटुंबीय मेहनत घेत असतात.
गेल्या दहा ते बारा वर्षांत अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे फळभाज्या आणि पालेभाज्या यांची शेती करत वर्षाखेर तब्बल बारा लाखांच्या आसपास उत्पन्न जाधव घेत आहेत.
सुदर्शन हे त्यांच्या शेतातील एक एकर क्षेत्रात गॅलन जातीच्या वांग्याची यशस्वी शेती करत आहेत.
या जातीच्या वांग्याची खासियत म्हणजे हे कमी जागेत जास्त उत्पन्न देणारे पीक आहे.
3 ते 4 महिने सरासरी तब्बल 40 टन गॅलन वांगीचे उत्पन्न सुदर्शन काढतात.
दरवर्षी मिळणाऱ्या 8 लाख रुपये उत्पन्नातून मशागत खर्च साधारण 2 लाख सोडल्यास जवळपास 6 लाख रुपयांचा नफा सुदर्शन यांना फक्त या शेतीतून मिळते.