मुंबई, 25 मार्च : आपलं एखाद्या विशिष्ट शहराशी किंवा गावाशी एक खास नातं असतं. गेल्या काही वर्षांत नोकरी-व्यवसायानिमित्त ग्रामीण भागातून शहराकडे येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. या कारणांमुळे शहरात स्थायिक होण्याचं प्रमाणदेखील वाढलं आहे. नोकरी, व्यवसाय किंवा अन्य कारणांमुळे एखाद्या शहरात दीर्घ काळ वास्तव्य केल्यानंतर नकळत आपलं त्या शहराशी एक नातं निर्माण होतं. तिथली संस्कृती, परिसर, नागरिक आदी गोष्टी आपल्या जगण्याचा भाग बनून जातात. देशाच्या विविध भागांतून रोज हजारो नागरिक मुंबईत येत असतात. नशीब आजमावण्यासाठी मुंबईत येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अशा अनेकांना मुंबई शहर रोज आपल्यात सामावून घेत असतं. 'ह्युमन्स ऑफ बॉम्बे' या फेसबुक पेजवर मुंबईशी संबंधित सकारात्मक अनुभव, बातम्या नेहमीच शेअर केल्या जातात. दिल्लीत वाईट प्रसंगाला सामोरं गेल्यानंतर हताश झालेली एक व्यक्ती मुंबईत येते आणि त्या व्यक्तीला मुंबई शहर आपलंसं आणि सुरक्षित कसं वाटू लागतं, याबाबतचा एक अनुभव नुकताच या पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या पोस्टला नेटिझन्सकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
मुंबई म्हटलं की डोळ्यासमोर उभी राहते ती लोकांची गर्दी, लोकलची धडधड, जगण्याचा संघर्ष. रोज मुंबईत हजारो नागरिक दाखल होत असतात. हे शहरदेखील या सर्वांना आधार देत आपलंसं करून घेत असतं. कर्नाटकातल्या एका व्यक्तीला दिल्ली आणि मुंबई या दोन शहरांमध्ये आलेला अनुभव ह्युमन्स ऑफ बॉम्बे या पेजवरून शेअर करण्यात आला आहे.
ठाणेकरांच्या विरंगुळ्याची आवडती जागा असलेल्या उपवन तलावाचा इतिहास माहिती आहे? पाहा Video
या अनुभवात ती व्यक्ती म्हणते, `मी खूप आशेनं दिल्लीला गेलो होतो; पण पहिल्याच दिवशी मला या शहरात अत्यंत वाईट अनुभवाला सामोरं जावं लागलं. माझी मेहनतीची सर्व कमाई एका क्षणात वाया गेली. तो माझा दिल्लीतला पहिला दिवस होता. त्या दिवशी मी दिल्लीतल्या चांदणी चौकात फिरायला गेलो होते. मी या शहराविषयी खूप ऐकलं होतं. त्यामुळे दिल्ली पाहण्याची माझी खूप इच्छा होती. वयाच्या 46व्या वर्षापर्यंतचं आयुष्य शेतीत खर्च केल्यानंतर मी स्वतःसाठी जगण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षभरापासून मी देशभरातल्या वेगवेगळ्या शहरांना भेटी देत आहे. वर्षभरात मी तमिळनाडूतल्या मंदिरांपासून उत्तराखंडातल्या पर्वतांपर्यंत अनेक ठिकाणी प्रवास केला; पण दिल्लीतला अनुभव माझ्यासाठी धक्कादायक होता.`
`त्या दिवशी चांदणी चौकात फिरायला गेलो. एका दुकानासमोर उभा असताना, कुणीतरी माझ्यामागून आलं आणि त्याने मागच्या खिशात असलेलं पैशांचं पाकीट चोरलं. मी किंचाळलो आणि त्याच्या मागे पळत गेलो; पण काहीही उपयोग झाला नाही. मी माझ्या कमाईचे 45 हजार रुपये गमावले होते. विशेष म्हणजे त्या वेळी मला कोणीही मदत केली नाही. मी जेव्हा मदत मागितली, तेव्हा लोकांनी मला टाळलं आणि माझ्याकडे नुसते बघत राहिले. या प्रसंगाने मी निराश झालो. त्याच रात्री पहिल्या ट्रेनने मी कर्नाटकला परतलो,` असं त्या व्यक्तीनं सांगितलं.
`काही आठवड्यांनंतर मी मुंबईत आलो. 'मुंबईत गेलास की मरीन ड्राइव्ह अवश्य बघ' असा सल्ला मला मित्रांनी दिला होता. त्यामुळे मी मरीन ड्राइव्हला गेलो. मला ही जागा खूप भावली. 'इथं बसलात की वेळ थांबते' असं लोक म्हणतात ते खरं आहे. मला हे शहर माझ्या शहराप्रमाणेच वाटलं. मी मरीन ड्राइव्हवर बराच वेळ बसलो. माझ्यासारखे अनेक जण इथं समुद्राशी बोलायला येतात. आपल्या मनातल्या भावना व्यक्त करतात. मला मुंबई आवडली. मला हे शहर सुरक्षित वाटलं. मी तर म्हणेन, की मुंबईच बेस्ट आहे,` अशी प्रतिक्रिया या व्यक्तीने व्यक्त केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.