ग्वाल्हेर, 23 मे : लग्नमंडप (Marriage) सजला होता. नवरदेवाची वरात दारात पोहोचली होती. काही वेळात लग्नाचे विधी पार पडणार होते. मात्र, त्याअगोदरच नवरी तिच्या प्रियकरासह पळून गेल्यानं गोंधळ उडाला. हे कळताच नवरीच्या शोधात तिच्या नातेवाईकांनी प्रियकराचं घर गाठलं. तिथं नवरी सापडली नसल्यानं प्रियकराच्या घरच्यांना थेट जीवे मारण्याची धमकी दिली. मात्र, हे कळल्यानंतर नवरीनं प्रियकरासोबत पोलीस ठाणे (Police station) गाठलं आणि सुरक्षेची मागणी केली. या प्रेमी युगुलानं चक्क आपल्याला अटक करून आठ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचीही मागणी केली. या प्रकारानंतर पोलिसांकडून दोघांच्याही कुटुंबीयांना बोलावून समुपदेशन केलं गेलं.
या 20 वर्षीय मुलीचं शनिवारी लग्न होतं. मात्र, तिचं राधेश्यामशी प्रेमसंबंध होते. दोघांनीही एकमेकांना कायमसोबत राहण्याचे वचन दिलं होतं. मात्र, मुलीच्या कुटुंबीयांना हे नातं मान्य नव्हतं. त्यांनी दुसऱ्या मुलाशी तिचं लग्न ठरवलं होतं. घरात मंडप घातलेला होता. वरात दारात आली होती. हे सर्व पाहिल्यावर नवरी मुलगी तिथून पळाली. घराबाहेर तिला तिचा प्रियकर राधेश्याम भेटला. यानंतर ते दोघे त्यांच्या घरी पोहोचले. इकडं नवरी पळाल्याचं कळताच तिच्या घरच्यांनी तिचा शोध सुरू केला. ते राधेश्यामच्या घरापर्यंत पोहोचले आणि त्याच्या घरच्यांना धमकीही दिली. हे समजल्यानंतर प्रेमी जोडप्यानं शनिवारी संध्याकाळी ग्वाल्हेर पोलीस अधीक्षक अमित सांघी यांचे कार्यालय गाठलं. तिथं त्यांनी पोलिसांनी आपण दोघेही सज्ञान असल्याचं सांगून एकमेकांशी लग्न करण्याची इच्छा असल्याचं सांगितलं. मात्र, कुटुंबीय आमच्या आडवे येत असल्याचं म्हटलं. तसंच स्वतःच्या जिवाला धोका असल्याचं सांगून सुरक्षेची मागणी केली. पोलीस अधीक्षकांनी या दोघांना पोलीस ठाण्यात पाठवलं आहे. दोघांच्या कुटुंबीयांना बोलवून समुपदेशनही केलं.
नववधूचं म्हणणं
शनिवारी माझं लग्न ठरवलं होतं. पण मला त्या व्यक्तीशी लग्न करायचं नाही. मी माझ्या प्रियकराचा हात धरून घरातून पळ काढला. मला त्याच्याबरोबर रहायचं आहे. आम्ही मदतीसाठी पोलिसांकडे आलो आहोत.
हे वाचा - फिटनेसचं वेड असणारा मराठमोळा अभिनेता; पाहा चेतन चिटणीसबाबतच्या काही खास गोष्टी
8 दिवस तुरूंगात पाठवा; अन्यथा, ते मला ठार मारतील
मुलीचा प्रियकर राधेश्याम याचं म्हणणं आहे की, त्याच्या प्रेयसीचं कुटुंब त्याला मारण्यासाठी मागे लागलं आहे. मी त्यांच्या हाती लागलो तर ते मला मारून टाकतील. पोलिसांनी आपल्याला 8 दिवस तुरूंगात पाठवावं, ज्यामुळे आपला जीव वाचू शकेल. अन्यथा, आम्ही दोघे जीव देऊ.
मुलगी महिलागृहामध्ये राहील
समुपदेशनादरम्यान पोलिसांनी मुलगा आणि मुलीच्या कुटुंबीयांना त्यांनी या दोघांवर जबरदस्ती न करण्याचा स्पष्ट इशारा दिला आहे. मुलाच्या कुटुंबीयांनी त्यांच्या लग्नाला होकार दिला. त्यामुळं मुलाला त्यांच्याबरोबर पाठवण्यात आले. मात्र, मुलीचे कुटुंबीय या लग्नाला तयार नव्हते. अखेर तिला महिलागृहात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. हा सर्व प्रकार ग्वाल्हेरच्या हस्तिनापूर गावात घडला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Love story, Marriage