गुवाहाटी, 12 जानेवारी : शहरी भागात 24 तास येणारं पाणी सांडताना कसलाही विचार काही मंडळी करत नाहीत. देशातल्या अनेक भागात पिण्याचं पाणी मिळण्यासाठी संघर्ष करावा लागतो, ही वस्तुस्थिती आहे. पाण्यासाठी रोज वणवण करणाऱ्यांना घरात नळातून आलेल्या पाण्याची किंमत कळते. नळातून घरात पहिल्यांदा पाणी येतं तो दिवस त्यांच्यासाठी एखाद्या सणापेक्षा कमी नसतो. सोशल मीडियावर (Social Media) एका महिलेचा व्हिडीओ (Video) व्हायरल (Viral) झाला आहे. तो व्हिडीओ पाहून ‘या’ दिवसासाठी महिलेनं किती संघर्ष केला असेल याची कल्पना येते.
सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होणारा हा व्हिडीओ आसाममधील (Assam) आहे. या महिलेच्या घरी जेंव्हा नळातून पाणी आलं तेंव्हा तिला क्षणभर हे स्वप्नच असल्याचा भास झाला. कारण, आजवरच्या आयुष्यात ‘हा’ दिवस पाहयला मिळेल याची तिनं कधी कल्पनाही केली नव्हती. त्यांनी लगेच नळासमोर दोन्ही हात आणि डोकं झुकवून नमस्कार केला. गेल्या अनेक वर्षांपासून यासाठी केलेली तपस्या पूर्ण झाल्याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर होतं.
केंद्रीय मंत्र्यांनी शेअर केला व्हिडीओ
केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत (Gajendra Singh Shekhawat) यांनी देखील हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. ‘आसाममधील या भगिनी, आपल्या घरात नळाच्या माध्यमातून आलेल्या पाण्याचं स्वागत त्याचं वंदन करुन करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सुरु केलेल्या ‘जल जीवन मिशन’च्या माध्यमातून स्वातंत्र्यानंतर इतकी वर्ष मुलभूत गोष्टींचा त्रास सहन करणाऱ्या लोकांच्या आयुष्यातही बदल होत आहे. हेच या व्हिडीओतून स्पष्ट होते.’ असं शेखावत यांनी म्हंटलं आहे.
असम की यह बहन अपने घर में ‘नल से जल’ का स्वागत सिर झुकाकर ईश्वर का धन्यवाद देते हुए कर रही हैं। प्रधानमंत्री मोदीजी द्वारा संकल्पित जल जीवन मिशन स्वतंत्रता के वर्षों बाद तक जल जैसी मूलभूत आवश्यकता की कमी झेल रहे लोगों के जीवन को कैसे परिवर्तित कर रहा है यह इस वीडियो से स्पष्ट है। pic.twitter.com/8VV3aXjtrC
— Gajendra Singh Shekhawat (@gssjodhpur) January 8, 2021
काय आहे जल जीवन मिशन?
मोदी सरकारनं 15 ऑगस्ट 2019 रोजी ‘जल जीवन मिशन’ योजना सुरु केली आहे. या योजनेच्या अंतर्गत गेल्या दीड वर्षात 2 कोटी 78 लाख घरांमध्ये नळाच्या माध्यमातून पाणी पोहचवण्यात आलं आहे. 2024 पर्यंत देशातील ग्रामीण भागातील सर्व घरांमध्ये स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी देण्याचा मोदी सरकारचा संकल्प आहे, असं शेखावत यांनी सांगितलं.
जलशक्ती मंत्रालयानं गेल्या एका वर्षात 3 कोटी 23 लाख घरापर्यंत पाणी पोहचवलं आहे, असा दावा शेखावत यांनी केला आहे.