मुंबई, 05 ऑक्टोबर : देशांतर्गत रस्ते वाहतुकीवर वाढलेला ताण, अपघातांचं वाढतं प्रमाण पाहता भारत सरकार जलवाहतूक वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे. या दृष्टिकोनातून प्रकल्पांची आखणी केली जात आहे. प्रमुख शहरांमधल्या नद्यांच्या माध्यमातून जलवाहतूक सुरू करण्याबाबत येत्या काही वर्षांत अंमलबजावणी होऊ शकते; मात्र केवळ घरंच नव्हे तर संपूर्ण अपार्टमेंटची उभारणी पाण्यावर झाली तर? पाण्यातूनच रस्ते, पाण्यातच मार्केट, अगदी शेतीदेखील पाण्यातच केली जाऊ लागली तर? पाण्यात एखादं छोटंसं शहर वसवलं तर? तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे. पाण्यात अशा गोष्टी उभारणं केवळ अशक्य आहे. हवामानबदलामुळे अनेक भागांत समुद्राची पातळी वाढत आहे. त्यामुळे काही भाग बुडण्याचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पाण्यावर शहर वसवण्याबाबत (City On Water) एक योजना तयार केली जात आहे.
पाण्यावर वसवलेलं शहर ही संकल्पना कदाचित खात्रीची वाटणार नाही. परंतु, सध्या अशा योजनेवर काम सुरू आहे. पाण्यावर शहर वसवण्याचं काम फ्रेंच पॉलिनेसियातलं सर्वांत मोठं बेट असलेल्या ताहितीमधली एक कंपनी करत आहे. या कंपनीचं नाव ऑसिएनिक्स असं आहे. अशी शहरं वसवण्याचं काम ही कंपनी करते. विशेष म्हणजे, हा प्रकल्प संयुक्त राष्ट्रांच्या (United Nations) सहकार्यातून पूर्ण केला जाणार आहे. यात संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास संकल्पनेचा अवलंब केला जाणार आहे, असं वृत्त 'टीव्ही नाइन हिंदी'ने दिलं आहे.
SANITIZERS चा खप आला निम्म्यावर, Corona कमी होतोय की त्याची दहशत?
हवामानबदलाचा (Climate Change) प्रतिकूल परिणाम सर्वच गोष्टींवर होत असल्याचं दिसून येत आहे. या कारणामुळे समुद्राची पातळी वाढत असून, काही भाग बुडण्याचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पाण्यावर शहर वसवण्यासाठीची योजना ऑसिएनिक्स कंपनीकडून आखली जात आहे. ज्यांना हवामानबदलामुळे वारंवार घरं बदलावी लागतात, त्यांच्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय ठरणार आहे. अशा व्यक्तींना पाण्यावर राहिल्यानं कोणत्याच समस्येचा सामना करावा लागणार नाही.
किरीट सोमय्यांच्या बारामती दौऱ्यावर सुप्रिया सुळेंची मिश्किल प्रतिक्रिया
'डीडब्ल्यू'च्या वृत्तानुसार, पाण्यावर तरंगणाऱ्या या शहरात सुमारे 10 हजार नागरिक राहू शकणार आहेत. हे लोक कमी पाण्यावरची हरितगृहातली शेतीदेखील (Farming) करू शकतील. या शहरात शेअरिंगवर आधारित क्लायमेट न्यूट्रल ट्रान्स्पोर्टेशनची सुविधा असेल. यात आधुनिक बोटींचा समावेश असेल.
या शहरात खास बांबूपासून (Bamboo) घरं उभारण्यात येतील. संबंधित कंपनी अशी योजना आखत आहे, की तिथे बांधली जाणारी सर्व घरं विशेष कॉंक्रिटच्या मदतीनं उभारली जातील. जेणेकरून खाऱ्या पाण्याचा त्यांच्यावर कोणताही परिणाम होणार नाही. ही घरं फार टिकणार नाहीत, असा विचार तुम्ही करत असाल तर तो चुकीचा आहे. कारण ही घरं अगदी 200 वर्षंही टिकू शकतील. पाण्यावर तरंगणाऱ्या शहराची ही नवी संकल्पना मूर्त रूपात आल्यास जगाला एक नवा पर्याय नक्कीच उपलब्ध होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.