नवी दिल्ली, ता. 20 सप्टेंबर : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू करावी अशी विनंती केली आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटी न्युयॉर्क मध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्राच्या महासभे दरम्यान दोन्ही देशांमध्ये चर्चा होऊ शकते असंही खान यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. पंतप्रधान झाल्यानंतर इम्रान खान यांनी मोदींना पाठलेला हा चर्चेचा पहिलाच प्रस्ताव आहे.
संयुक्त राष्ट्राच्या महासभेदरम्यान परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री मेहमूद कुरैशी यांच्यात चर्चेची सुरूवात होऊ शकते. पंतप्रधान मोदींनी सुषमा स्वराज यांना अशा चर्चेची परवानगी द्यावी अशी विनंतीही खान यांनी केलीय.
इम्रान खान यांनी पंतप्रधानपदाची सूत्र स्वीकारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 20 ऑगस्टला इम्रान खान यांना पत्र लिहून भारताला शांतता आणि सौहार्द पाहिजे आहे अशी भावना व्यक्त केली होती. त्याला प्रतिसाद म्हणून खान यांनी हे पत्र लिहिलं आहे.
2015 पासून भारत आणि पाकिस्तानमधली चर्चा पूर्णपणे बंद झाली आहे. पाकिस्तान जोपर्यंत दहशतवादाला पाठिंबा देणं बंद करत नाही तोपर्यंत पाकिस्तानशी चर्चा नाही अशी ठाम भूमिका घेत भारतानं चर्चेची दारं बंद केली होती. भारतानं पाकिस्तानशी चर्चा करावी यासाठी अमेरिकेने मध्यस्ती करावी अशी विनंतीही पाकिस्तानने अमेरिकेला केली होती.
इम्रान खान यांच्या पत्राला भारताकडून प्रतिसाद मिळण्याची शक्यता कमीच आहे. जोपर्यंत पाकिस्तान ठोस आश्वासन देत नाही तोपर्यंत भारत चर्चेसाठी उत्सुकता दाखवणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिलीय. तर लष्काराच्या दबावामुळे इम्रान खान यात फार काही धाडसी पाऊच उचलणार नाहीत अशी शक्यता तज्ञांनी व्यक्त केलीय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Imran khan, India, Narendra modi, Pakistan, Pakistan pm, इम्रान खान, नरेंद्र मोदी, पाकिस्तान, भारत