दुबई, 31 जानेवारी: संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) कार्यरत असणाऱ्या लाखो भारतीयांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. व्यवसायाच्या निमित्ताने UAE मध्ये स्थलांतर केलेल्या विदेशी नागरिकांना UAE सरकार त्यांच्या देशाचं नागरिकत्व (citizenship) बहाल करणार आहे. कोविड -19 विषाणू साथीच्या काळात विदेशी कामगारांनी अर्थव्यवस्थेला बळकटी आणल्यामुळे हे पाऊल उचलण्यात आलं असल्याचं बोललं जात आहे. विशेष बाब म्हणजे येथे काम करणाऱ्या केवळ कर्मचाऱ्यांनाच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबीयांनाही या देशाचं नागरिकत्व देण्यात येणार आहे.
दुबईचे राज्यकर्ते, देशाचे पंतप्रधान आणि देशाचे उपराष्ट्रपती शेख मोहम्मद बिन अल मख्तूम यांनी ही घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी म्हटलं की, कलाकार, लेखक, डॉक्टर, अभियंता आणि वैज्ञानिक तसेच त्यांचे कुटुंबीय संयुक्त अरब अमिरातीचं नागरिकत्व मिळवण्यासाठी अर्ज करू शकतात. याव्यतिरिक्त युएईचे नागरिक झाल्यानंतरही ते त्यांच्या जुन्या देशाचं नागरिकत्वही राखू शकतात. त्यामुळे मुळ देशाचं नागरीकत्व काढून न घेता UAE विदेशी नागरीकांना त्याच्या देशाचं नागरिकत्व बहाल करणार आहे.
हे ही वाचा-पत्नीने पतीची हत्या केली तरीही मिळणार फॅमिली पेन्शन; उच्च न्यायालयाचा निर्णय
त्यांना कोणते अधिकार मिळतील
नागरीकत्व देण्याची घोषणा केली असली तरी, नागरिकत्व मिळवणार्या परदेशी नागरिकांनाही येथील मूळ नागरिकांसारखेच हक्क दिले जातील का? हे अद्याप स्पष्ट करण्यात आलं नाही. आतापर्यंत येथे काम करणाऱ्या परदेशी नागरीकांना केवळ नोकरी किंवा कामाच्या दरम्यान व्हिसा मिळतो, जो काही काळानंतर नूतनीकरण करावा लागतो. तथापि, अलीकडच्या काही वर्षांत व्हिसाचे कठोर नियम शिथिल करण्यात आले आहेत. ज्यामुळे विशेष गुंतवणूकदार, विद्यार्थी आणि व्यावसायिक अधिक काळ या देशात राहू शकतात.