नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर : भारताशी (India) नेहमी वाकडेपणा घेणाऱ्या पाकिस्तानची (Pakistan) अवस्था सध्या अत्यंत बिकट झाली आहे. तरीही भारताशी नरमाईनं वागण्याचं शहाणपण काही तिथल्या राजकारण्यांना येत नाही. त्यामुळे जनतेची मात्र ससेहोलपट सुरू आहे. कोरोनाच्या संकटामुळे (Corona Pandemic) सगळ्या जगालाच मोठा आर्थिक फटका बसला आहे. सर्वच देशांमध्ये बेरोजगारी, आर्थिक मंदी या समस्या भेडसावत आहेत. त्या सोडवण्यासाठी सर्व देश प्रयत्न करत आहेत; मात्र पाकिस्तानचा भर इतर देशांकडून कर्ज घेण्यावर असल्यानं त्याच्यावरचा कर्जाचा बोजा प्रचंड वाढला आहे.
यामुळे आता तर परदेशांकडून तसंच जागतिक बँकेकडून (world) मिळणारी कर्जेही स्थगित होण्याची वेळ आली आहे. त्यातच भारताकडून आयातबंदीच्या धोरणाचा फटकाही पाकिस्तानला बसत आहे. इतर देशांकडून महाग दराने आयात करण्याच्या धोरणामुळे गेल्या वर्षभरात पाकिस्तानात महागाई गगनाला भिडली असून, सर्वसामान्य लोकांचे जगणे कठीण झाले आहे.
पाकिस्तानमध्ये महागाई (Inflation) इतकी प्रचंड वाढली आहे की साधा चहादेखील (Tea) तिथं 40 रुपये एक कप इतका महाग झाला आहे. शहरातच नाही तर छोटया गावांमध्येही जीवनावश्यक वस्तूंच्या किमती अफाट वाढल्या आहेत. दूध, साखर, चहा पावडर, गॅस सर्वांच्याच किमती वाढल्यानं तिथं चहाच्या किमतीत 35 टक्के वाढ झाली आहे. दुधाचा दर 105 रुपये लिटर वरून 120 रुपये लिटर झाला आहे, तर चहा पावडरची किंमत 800 ते 900 रुपये किलो झाली आहे. गॅस सिलेंडरची किंमत 1500 ते 3000 रुपये आहे. यामुळे चहा विक्रेत्यांच्या धंद्यावर विपरीत परिणाम झाला आहे.
वाचा : बुलेटप्रुफ स्मार्टफोन! लुटारूंनी मारली गोळी, पण मोबाईलने वाचवला जीव
चहाच्या स्टॉलवर चहा पिणाऱ्या ग्राहकांनी आता चहा पिण्याचे प्रमाण कमी केले आहे. चार पाच कप चहा पिणारे लोक आता दिवसातून दोन किंवा तीन कप चहा घेत आहेत, तर काही जणांनी चहा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अब्दुल अजीज या एका चहावाल्याने दिलेल्या माहितीनुसार, त्याची एका दिवसाची कमाई 2600 रुपये होती,पण त्यात त्याला फक्त 15 रुपये नफा मिळाला आहे. त्यामुळे त्यानं चहाची किंमत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
या सगळ्या परिस्थितीला कारणीभूत आहे ते पाकिस्तान सरकारचे धोरण. सरकारच्या अट्टाहासामुळे इथल्या जनतेला महागाईला तोंड दयावे लागत आहे. पाकिस्तानला भारताकडून स्वस्त किमतीत साखर, गहू आदी जीवनावश्यक वस्तू मिळू शकतात; पण भारत जोपर्यंत काश्मीरमध्ये पुन्हा कलम 370 आणत नाही तोपर्यंत पाकिस्तान भारताकडून साखर, गहू आदी जीवनावश्यक गोष्टी आयात (Import) करणार नाही, असं पाकिस्ताननं स्पष्ट केलं आहे. या अडेलतट्टुपणाचा फटका तिथल्या जनतेला सोसावा लागत आहे.
वाचा : पाकिस्तानचा जुगाड, Video बघून बोलाल... ''असं फक्त पाकिस्तानात होऊ शकतं'', हसूही येणार नाही रोखता
पाकिस्तान भारताऐवजी चीनकडून (China) महाग दराने साखर (Sugar) आयात करत आहे. चीनकडून पाकिस्ताननं तब्बल 110 रुपये किलो दराने 28 हजार 760 किलो साखर आयात केली आहे. गेल्या वर्षी हा दर 90 रुपये किलो होता. यंदा एप्रिल महिन्यात पाकिस्ताननं भारताकडून साखर घेण्यास नकार दिला.
जागतिक बँकेच्या एका अहवालानुसार, भारत पाकिस्तानमधील व्हिसाचे कठोर धोरण, उच्च शुल्क आणि किचकट प्रक्रिया दूर झाल्यास दोन्ही देशांमधील व्यापार 2 अब्ज डॉलर्सवरून 37 अब्ज डॉलर्सवर जाऊ शकतो. दोन्हे देशांसाठी ही बाब लाभदायी ठरू शकते; पण भारतावर कुरघोडी करण्यातच सार्थकता मानणाऱ्या पाकिस्तानच्या नेत्यांना हे शहाणपण सुचणे महत्त्वाचे आहे. तरच तिथल्या जनतेचे जगणे सुसह्य होऊ शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.