साऊथम्पटन, 20 जून : टीम इंडियाचा दिग्गज ऑफ स्पिनर आर.अश्विन (R Ashwin) याने त्याच्या निवृत्तीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. प्रतिस्पर्धेमुळे आपल्याला सर्वोत्तम कामगिरी करण्याची प्रेरणा मिळते, ज्यादिवशी स्वत:मध्ये सुधार करण्यासारखं वाटणार नाही, त्यादिवशी आपण क्रिकेट खेळणं सोडू, असं अश्विन म्हणाला आहे. अश्विन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) न्यूझीलंडविरुद्ध (India vs New Zealand) खेळत आहे.
'टेस्ट क्रिकेटमध्ये तुम्ही कायमच परफेक्ट होण्यासाठी प्रयत्न करता, त्यामुळे मी असं करतो. मी करियरमध्ये जे काही मिळवलं ते याच विचारामुळे. मी कोणत्याच गोष्टीत तडजोड केली नाही, कायमच स्वत:मध्ये सुधारणा करण्यावर भर दिला. जर मी वेगवेगळ्या गोष्टी करणं सोडून दिलं आणि नवीन काही करण्यासाठी धैर्य दाखवलं नाही, तर मी क्रिकेट खेळणं सुरू ठेवू शकणार नाही,' असं अश्विनने आयसीसीशी बोलताना सांगितलं.
34 वर्षांच्या अश्विनने टेस्ट क्रिकेटमध्ये 409 विकेट घेतल्या आहेत. विजयानंतर आपण फार जल्लोष का करत नाही, याचं कारणही अश्विनने सांगितलं. मी विजयाचा जल्लोष करत नाही, कारण विजय ही फक्त एक घटना आहे. विजय योजना आणि अभ्यासामुळे मिळतो, त्यामुळे मी जिंकल्यानंतर यापेक्षा चांगलं काय करू शकता येईल याचा विचार करतो, अशी प्रतिक्रिया अश्विनने दिली.
भारतामध्ये तुमचं खूप कौतुक होतं, पण मी एक सामान्य व्यक्ती आहे, ज्याला खेळून शांतता आणि आनंद मिळतो, असं वक्तव्य अश्विनने केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, R ashwin, Team india