मुंबई, 11 मे : भारतीय क्रिकेट टीम जेव्हा इंग्लंडमध्ये असेल तेव्हा आणखी एक टीम इंडिया श्रीलंकेच्या (India vs Sri Lanka) दौऱ्यावर जाईल. न्यूझीलंडविरुद्धची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) झाल्यानंतर टीम इंडिया इंग्लंडमध्येच राहिल. 18 जून ते 22 जून या काळात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होईल, यानंतर भारतीय खेळाडू इंग्लंडविरुद्धची 5 टेस्ट मॅचची सीरिज खेळतील. 4 ऑगस्टपासून या सीरिजला सुरुवात होणार आहे. कोरोनाचं संकट आणि क्वारंटाईनचे नियम यामुळे भारतीय टीम न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यानंतरही इंग्लंडमध्येच राहिल.
भारतीय टीम इंग्लंडमध्ये असतानाच जुलै महिन्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात वनडे आणि टी-20 सीरिज होणार आहे. या सीरिजसाठी पूर्णपणे वेगळ्या टीमची निवड केली जाणार आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार 13 जुलैला पहिली वनडे होईल, तर 16 आणि 19 जुलैला उरलेल्या दोन्ही मॅच खेळवल्या जातील. तर 22 जुलैपासून टी-20 सीरिजला सुरुवात होईल. 24 जुलैला दुसरी टी-20 आणि 27 जुलैला तिसरी टी-20 होईल.
एक देश, दोन टीम
याआधीही भारतीय टीम एकाच वेळी दोन दौऱ्यांवर गेली होती. 1998 साली पहिल्यांदा क्रिकेटला कॉमनवेल्थ (Commonweath Games) खेळामध्ये सामील करण्यात आलं होतं, तर त्याचवेळी भारताला सहारा कपमध्येही (Sahara Cup) खेळायचं होतं. मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वात भारतीय टीम सहारा कप खेळण्यासाठी गेली, तर अजय जडेजाच्या नेतृत्वात भारतीय टीम कॉमनवेल्थ खेळण्यासाठी गेली. जडेजाच्या टीममध्ये सचिन तेंडुलकर, रोहन गावसकर, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि अनिल कुंबळे होते, तर अजहरच्या टीममध्ये सौरव गांगुलीला संधी मिळाली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, India vs england, India Vs Sri lanka, Team india