मुंबई, 30 ऑगस्ट : भारताचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्यात वाद असल्याच्या चर्चा वर्ल्ड कपपासून सुरू झाल्या. अजुनही या चर्चा थांबण्याचं नाव घेत नाहीत. यावर आतापर्यंत अनेक माजी क्रिकेटपटूंनी त्यांचं मत जाहीर केलं आहे. वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पराभव पत्करावा लागल्यानंतर दोघांमध्ये मतभेद झाल्याचं म्हटलं जात होतं. दरम्यान रोहितनं विराट आणि अनुष्का यांना इन्स्टाग्रामवर अनफॉलोही केलं. तर माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी म्हटलं होतं की, विराट-रोहितमध्ये वाद नाही हे छतावर उभा राहून ओरडून सांगितलं तरी चर्चा संपणार नाही.
दरम्यान, भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागनं विराट-रोहितच्या वादाबद्दल मत व्यक्त केलं आहे. त्यानं म्हटलं की, असा प्रकारच्या चर्चा बिनबुडाच्या असतात. अशी चर्चा करणं मुर्खपणापेक्षा कमी नाही. दोघांमध्ये वाद असल्याचा कोणताही पुरावा नाही. विराट आणि रोहित शर्मा यांच्यातील वादावर बोलताना सेहवागनं धोनीसोबत त्याच्या भांडणाबद्दलही मौन सोडलं.
सेहवाग म्हणाला की, मला नाही माहिती ही चर्चा कुठून सुरु होते. एका घरात राहणारे चार लोक एकाचवेळी जेवावेत हे गरजेचं नाही. ते नेहमीच सोबत रहावेत असंही नसतं. त्यामुळं विराट-रोहित वेगवेगळे दिसले तर त्यात वावगं काही नाही.
2012 मध्ये भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि विरेंद्र सेहवाग यांच्यात भांडण झाल्याची चर्चा होती. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिरंगी मालिकेवेळी दोघांत मतभेद होते असं म्हटलं जात होती. धोनी तीन वरिष्ठ खेळाडूंना संघात घेऊ इच्छित नव्हता. यामध्ये सचिन, सेहवाग आणि गंभीर यांच्या नावांचा समावेश होता. सेहवागला हे विचारताच तो म्हणाला की, माझ्यात आणि धोनीमध्ये वाद असल्याचं म्हटलं जात होतं मात्र, असं काही नव्हतं.
रस्त्यावर थुंकणाऱ्यांनो व्हा सावध, नाहीतर मिळेल 'ही' शिक्षा VIDEO VIRAL
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: MS Dhoni, Virat kohli, Virender sehwag