मुंबई, 1 डिसेंबर : विराट कोहली (Virat Kohli) भारताच्या वनडे टीमचा कॅप्टन राहणार का नाही, याचा निर्णय याच आठवड्यात होणार आहे. चेतन शर्मा यांच्या नेतृत्वात निवड समिती दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) दौऱ्यासाठी टीमची घोषणा करणार आहे, त्यावेळीच विराटच्या भवितव्याचा फैसला होईल. दक्षिण आफ्रिकेमध्ये कोरोनाचा नवा व्हेरियंट आढळल्यानंतरही हा दौरा नियोजित वेळेनुसार होईल, असं बीसीसीआयच्या (BCCI) अधिकाऱ्याने सांगितली आहे. टीम इंडिया या दौऱ्यात तीन टेस्ट, तीन वनडे आणि 4 टी-20 मॅच खेळणार आहे.
2022 मध्ये टीम इंडिया टी-20 आंतरराष्ट्रीय जास्त खेळणार आहे, यामध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपचा (T20 World Cup 2022) समावेश आहे. सध्याच्या कार्यक्रमानुसार पुढच्या 7 महिन्यांमध्ये टीम इंडिया फक्त 9 वनडे खेळणार आहे, यातल्या 6 मॅच परदेशात (3 दक्षिण आफ्रिका, 3 इंग्लंड) होणार आहेत. बीसीसीआयच्या एका गटाला विराटने वनडे टीमचं कर्णधार व्हावं, असं वाटतं. तर दुसरा गट टी-20 आणि वनडे टीमचं नेतृत्व रोहित शर्माला (Rohit Sharma) द्यावं, कारण रोहितला 2023 वनडे वर्ल्ड कपची तयारी करण्यासाठी वेळ मिळेल, या मताचा आहे.
वनडे कर्णधाराबाबतचा अंतिम निर्णय बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि सचिव जय शाह (Jay Shah) हे दोघं घेणार आहेत. विराट कोहलीने वर्कलोडचं कारण देत टी-20 टीमच्या नेतृत्वाचा राजीनामा दिला होता, पण त्याने अन्य फॉरमॅटबाबत काहीही सांगितलं नाही, त्यामुळे विराटला वनडे आणि टेस्ट टीमचं कॅप्टन राहण्याची इच्छा आहे. कोहलीला त्याच्या नेतृत्वात एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही, त्यामुळेही तो अनेकांच्या निशाण्यावर आहे.
2023 वनडे वर्ल्ड कप (ICC World Cup 2023) भारतातच होणार आहे. रोहितच्या नेतृत्वात टीम इंडिया पुढच्या वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपसाठी मैदानात उतरेल. लिमिटेड ओव्हर आणि टेस्ट क्रिकेटमध्ये दोन वेगवेगळे कर्णधार असावेत, असं अनेक तज्ज्ञांचं मत आहे, त्यामुळे विराटच्या वनडे कॅप्टन्सीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rohit sharma, Team india, Virat kohli