नवी दिल्ली, 8 डिसेंबर: बीसीसीआयने (BCCI)आज मोठी घोषणा केली आहे. बीसीसीआयने आज टीम इंडियाच्या (Team India) नव्या टी-20 आणि वनडे टीमच्या कॅप्टनची घोषणा केली आहे. भारतीय टीमच्या टी-20 आणि वनडे टीमची धुरा आता हिटमॅन रोहित शर्मा(Rohit Sharma) याच्याकडे असणार आहे. बीसीसीआयने अधिकृतरित्या नव्या कॅप्टनची घोषणा केली आहे. तर रोहितकडे कसोटी क्रिकेटच्या संघाचं उपकर्णधारपदही देण्यात आले आहे. त्यामुळे संघ एका नव्या नेतृत्वात इथून पुढील वाटचाल करणार आहे.
विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखाली टीम इंडियाची कामगिरी तिन्ही फॉरमॅटमध्ये समाधानकारक होती. मात्र यादरम्यान संघाला एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही. 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत, 2019 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आणि 2021 मधील जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत संघाचा पराभव झाला.
नुकताच हा संघ T20 विश्वचषकाच्या सुपर-12 मधून बाहेर पडला होता. अलीकडेच प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपला आहे. त्याच्या जागी राहुल द्रविड संघाचा नवा प्रशिक्षक बनला आहे. शास्त्रींच्या जाण्याने कोहलीचा दर्जा कमी होऊ लागला आहे. अशी चर्चा क्रिकेट जगतात रंगली आहे.
विराट कोहलीच्या एकदिवसीय विक्रमाबद्दल बोलायचे तर त्याने 95 सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे. त्यांना 65 मध्ये विजय मिळाला आहे तर 27 मध्ये पराभव पत्करावा लागला आहे. म्हणजेच त्यांनी 68 टक्के सामने जिंकले आहेत.
त्याचबरोबर रोहित शर्माने भूतकाळातही वेळोवेळी वनडेचे कर्णधारपद भूषवले आहे. त्यांनी 10 पैकी 8 सामने जिंकले आहेत आणि 2 गमावले आहेत. म्हणजेच 80 टक्के सामने जिंकले.
टी-20 रेकॉर्ड पाहता कोहलीने 50 पैकी 30 सामने जिंकले आहेत. म्हणजेच 60 टक्के. त्याचवेळी रोहितने 22 पैकी 18 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकले आहेत. म्हणजे 82 टक्के. म्हणजेच दोन्ही फॉरमॅटमध्ये त्याचा रेकॉर्ड कोहलीच्या तुलनेत सरस आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rohit sharma, Virat kohli