मुंबई, 14 डिसेंबर : रोहित शर्माला वनडे टीमचा कर्णधार केल्यानंतर विराट कोहली (Rohit Sharma Virat Kohli) नाराज झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत, त्यातच आता विराटने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (India vs South Africa) वनडे सीरिजमधून माघार घेतल्याचं वृत्त आलं आहे, त्यामुळे या चर्चांना उधाण आलं आहे. टी-20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup) रोहित शर्मा आणि विराट कोहली एकत्र खेळले नाहीत. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सीरिजवेळी विराट कोहलीने तर टेस्ट सीरिजवेळी रोहित शर्माने विश्रांती घेतली, यानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यातल्या टेस्ट सीरिजआधी रोहित शर्माच्या मांडीच्या स्नायूला दुखापत झाली, त्यामुळे तो टेस्ट सीरिजमधून बाहेर झाला आहे. आता विराटही वनडे सीरिज खेळला नाही, तर दोघांमधल्या वादाच्या चर्चा आणखी मोठ्या प्रमाणावर होतील.
भारतीय क्रिकेटमध्ये सध्या सुरू असलेल्या या संशयानंतर आता बीसीसीआयने (BCCI) प्रतिक्रिया दिली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यामध्ये काहीही वाद नसल्याचा दावा बीसीसीआयने केला आहे. तसंच विराट कोहलीने वनडे मॅचसाठी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली किंवा सचिव जय शाह यांना अजूनतरी सुट्टी मागितली नाही, असं बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं आहे. आजच्या परिस्थितीनुसार विराट दक्षिण आफ्रिकेत 19, 21 आणि 23 जानेवारीला होणाऱ्या वनडे सीरिजमध्ये खेळेल, असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितलं.
'बायो-बबलच्या कठोर नियमांमुळे खेळाडू आपल्या कुटुंबासोबत चार्टर्ड विमानाने प्रवास करणार आहेत. कर्णधार विराट कोहलीही कुटुंबासोबत प्रवास करेल, पण टेस्ट सीरिजनंतर जर बायो-बबलमुळे त्याला थकवा आला तर तो विश्रांती घेऊ शकतो, याबाबत तो निवड समिती अध्यक्ष आणि बीसीसीआय सचिव जय शाह यांना सांगू शकतो,' असं बीसीसीआयचा अधिकारी म्हणाला.
दक्षिण आफ्रिका दौरा संपल्यानंतर टीम इंडिया भारतात परतेल, यानंतर पुन्हा त्यांना 3 आठवडे बायो-बबलमध्ये राहावं लागणार आहे, कारण श्रीलंकेची टीम टेस्ट आणि टी-20 सीरिज खेळण्यासाठी भारतात येणार आहे. विराट त्याची मुलगी वामिकाचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी वनडे सीरिजमधून विश्रांती घेईल, असं सांगितलं जात आहे. वामिकाचा वाढदिवस 11 जानेवारीला आहे, त्यादिवशी विराट आपली 100 वी टेस्ट मॅच खेळत असेल.
विराट कोहली मुलीच्या जन्मावेळीही ऑस्ट्रेलिया दौऱ्यातली पहिली टेस्ट खेळून भारतात परतला होता. तसंच बायो-बबल आणि तणावाबाबत त्याने याआधीही प्रतिक्रिया दिली आहे. सततच्या क्रिकेटमुळे विराटने टी-20 फॉरमॅटची कॅप्टन्सी सोडण्याचा निर्णयही घेतला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BCCI, Rohit sharma, Team india, Virat kohli