मुंबई, 16 फेब्रुवारी : क्रिकेटच्या मैदानात आता विदर्भानं आपला दबदबा निर्माण करायला सुरूवात केली आहे. विदर्भानं आता सलग दुसऱ्यांदा इराणी करंडकावर आपलं नाव कोरलं आहे. यापूर्वी विदर्भानं सलग दुसऱ्यांदा रणजी करंडकावर नाव कोरलं होतं. त्यानंतर आता इराणी करंडक जिंकत विदर्भानं 'यहां के हम सिकंदर' असल्याचं सिद्ध केलं आहे. पण, यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे विदर्भाच्या संघानं विजयानंतर मिळालेली रक्कम ही पुलवामामध्ये शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना देण्याचा निर्णय घेतला आहे.
इरणी करंडकाच्या शेवटच्या दिवशी विदर्भानं शेष भारतावर विजय मिळवला आहे. शेष भारतानं दिलेलं 280 धावांचं आव्हान विदर्भानं पार करत इराणी करंडकावर सलग दुसऱ्यांदा नाव कोरलं आहे. गणेश सतीश, अथर्व तायडे यांनी केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर विदर्भानं ही किमया केली आहे. काही दिवसांपूर्वी विदर्भानं सौराष्ट्राचा पराभव करत सलग दुसऱ्यांदा रणजीवर आपलं नाव कोरलं होतं.
280 धावाचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या विदर्भाच्या डावाची सुरूवात अडखळत झाली. कर्णधार फैज फजल हा एकही धाव न करता तंबूत परतला. त्यानंतर संजय रामास्वामी, अथर्व तायडे आणि गणेश सतीश यांनी संयमी खेळी करत विदर्भाला विजय मिळवून दिला. दरम्यान, विजयासाठी केवळ 11 धावांची गरज असताना दोन्ही कर्णधारांनी सामना अनर्णित राखण्यावर एकमत केलं. यानंतर विदर्भाने पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर सामन्यात विजय मिळवला.
==================================