नवी दिल्ली, 19 जून : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना आज (रविवार) बंगळुरू येथे खेळवला जाणार आहे. या मालिकेची सुरुवात टीम इंडियासाठी चांगली झाली नव्हती. भारतीय संघाला पहिल्या दोन सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. पण, यानंतर ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने सलग दोन सामने जिंकून मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली. आता या मालिकेतील विजेत्या संघाचा निर्णय बंगळुरूमध्ये होणार आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये टीम इंडियाचा ज्या प्रकारे पराभव झाला, ते पाहता महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली जे काम करू शकले नाहीत, ते या वेळीही अपूर्णच राहणार, असे वाटत होते. पण, पंतच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पुढील दोन सामने जिंकून मालिकेत बरोबरी तर केलीच, पण इतिहास बदलण्याच्या आशाही उंचावल्या. आता भारतीय संघ मालिका जिंकण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. भारताने ही मालिका जिंकल्यास दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी-20 मालिका आपल्या भूमीवर जिंकण्याची ही पहिलीच वेळ असेल.
यापूर्वी टीम इंडियाला दोनदा असे करता आलेले नाही. एकदा महेंद्रसिंग धोनी कर्णधार होता आणि दुसऱ्या वेळी संघाची कमान विराट कोहलीच्या हातात होती.
हे वाचा - भाऊच झाला भावाचा वैरी! इंटरनॅशनल मॅचमध्ये भावानेच केलं जेसन रॉयला बोल्ड, Video
धोनीच्या नेतृत्वाखाली भारताचा पराभव -
दक्षिण आफ्रिकेने 2015 साली भारतात पहिली टी-20 मालिका खेळली होती. 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारताला 2-0 ने पराभवाचा सामना करावा लागला. तेव्हा महेंद्रसिंग धोनी टीम इंडियाचा कर्णधार होता. दक्षिण आफ्रिकेने धर्मशाला येथील पहिला टी-20 आणि कटकमधील दुसरा टी-20 जिंकला. कोलकाता येथे होणारा मालिकेतील तिसरा सामना एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आला होता.
हे वाचा - भारतीय क्रिकेटपटूने ठोकलं लागोपाठ दुसरं शतक, मैदानात पत्नीसाठी झळकावलं लव्ह लेटर
कोहलीच्या नेतृत्वाखालीही हुलकावणीच -
यानंतर 2019 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात आला आणि दोन्ही देशांमध्ये 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळली गेली. यावेळीही भारतीय संघ आफ्रिकेला पराभूत करू शकला नाही. धर्मशाला येथील मालिकेतील पहिला सामना रद्द करण्यात आला. यानंतर भारतीय संघाने मोहाली येथे झालेला दुसरा टी-20 सामना जिंकला, तर पाहुण्या संघाने बंगळुरूमधील तिसरा सामना जिंकला. अशाप्रकारे मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली आणि आफ्रिकेला मायदेशात पराभूत करण्याचे भारताचे स्वप्न पुन्हा अपूर्ण राहिले. मात्र, रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या टी-20 सामन्यात पंतच्या नेतृत्वाखाली भारताला हा इतिहास बदलण्याची संधी असेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, T20 cricket