मुंबई, 1 जून : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) हा कायम सोशल मीडियावर सक्रीय असतो. काहीच दिवसांपूर्वी विराटने त्याच्या चाहत्यांसाठी प्रश्न-उत्तरांचं सत्र ठेवलं होतं. या सत्रामध्ये विराटने त्याच्या चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत होता. यातल्या एका चाहत्याने विराटला त्याचा डाएट प्लान विचारला.
खूप भाज्या, थोडी अंडी, दोन कप कॉफी, डाळ, किनोआ, भरपूर पालक, तसंच मला डोसा खूप आवडतो, पण सगळं काही मर्यादित खातो. माझ्या डाएटमध्ये भारतीय खाणंच जास्त असतं, कधी कधी चायनीजही खातो. बदाम, प्रोटीन बार आणि फळं यांचाही माझ्या डाएटमध्ये समावेश आहे, असं विराटने सांगितलं.
विराटने सोशल मीडियावर आपण अंड खातो, असं सांगितल्यानंतर त्याला ट्रोल करायला सुरुवात झाली. विराट स्वत:ला विगन सांगतो, मग तो अंडी कशी खातो? असा सवाल अनेकांनी उपस्थित केला. चाहत्यांच्या या ट्रोलिंगवर विराट चांगलाच संतापला आणि त्याने प्रत्युत्तरही दिलं.
'मी विगन असल्याचा कधीही दावा केला नाही, पण मी शाकाहारी होण्याबाबत बोललो आहे. दीर्घ श्वास घ्या आणि भाज्या खा (इच्छा असेल तर)' असं विराट त्याच्या ट्वीटमध्ये म्हणाला.
I never claimed to be vegan. Always maintained I'm vegetarian. Take a deep breath and eat your Veggies (if you want 😉)💪😂✌️
— Virat Kohli (@imVkohli) June 1, 2021
विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया 2 जून रोजी इंग्लंडला रवाना होणार आहे. या दौऱ्यात 18 जून ते 22 जूनमध्ये भारत-न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) होणार आहे. यानंतर भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात 5 टेस्ट मॅचची सीरिज खेळवली जाईल.
कपिल, गांगुली, धोनीची बरोबरी करणार विराट?
टीम इंडियाने कपिल देव (Kapil Dev) यांच्या नेतृत्वात पहिल्यांदाच 1983 साली वनडे वर्ल्ड कप जिंकला होता. तेव्हा भारतीय टीमने मजबूत अशा वेस्ट इंडिजला धूळ चारली होती. यानंतर सौरव गांगुली (Sourav Ganguly) कर्णधार असताना भारत 2002 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये संयुक्त विजेता बनला होता. पुढे एमएस धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वात भारताने 2007 टी-20 वर्ल्ड कप, 2011 मध्ये 50 ओव्हरचा वर्ल्ड कप आणि 2013 साली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. कोहलीने आतापर्यंत 200 सामन्यांमध्ये भारताचं नेतृत्व केलं, पण टीमला अजून एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल जिंकून विराट कपिल, गांगुली आणि धोनीच्या यादीत जाऊ शकतो.
विराट कोहलीने कर्णधार म्हणून इंग्लंडमध्ये 5 टेस्ट खेळल्या आहेत, यातल्या एका मॅचमध्ये भारताचा विजय झाला, तर 4 टेस्ट मॅच ड्रॉ झाल्या. कर्णधार म्हणून कपिल देव यांनी इंग्लंडमध्ये 3 सर्वाधिक 2 टेस्ट जिंकल्या आणि एक टेस्ट ड्रॉ झाली. कपिल देव यांच्या नेतृत्वात भारताने इंग्लंडमध्ये एकही टेस्ट गमावली नाही.
एमएस धोनीच्या नेतृत्वात भारताने इंग्लंडमध्ये 9 टेस्ट खेळल्या, यातल्या एका मॅचमध्ये भारताचा विजय झाला आणि 7 मध्ये पराभव पत्करावा लागला. गांगुली कर्णधार असताना 4 पैकी एक विजय आणि एक पराभव झाला. राहुल द्रविडच्या (Rahul Dravid) नेतृत्वात भारताने 3 पैकी 1 टेस्ट जिंकली आणि 2 टेस्ट ड्रॉ झाल्या. फक्त कपिल देव आणि राहुल द्रविड यांच्या नेतृत्वात भारताने इंग्लंडमध्ये एकही टेस्ट गमावली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Fitness, Team india, Virat kohli