दुबई, 18 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपमधल्या (T20 World Cup) भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातल्या महामुकाबल्याआधी टीम इंडियाचं (Team India) टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सराव सामन्यात पाकिस्तानचा (Pakistan vs West Indies) 7 विकेटने दणदणीत विजय झाला आहे. वेस्ट इंडिजने दिलेलं 131 रनचं आव्हान पाकिस्तानने 15.3 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) 41 बॉलमध्ये 50 रन तर फखर झमानने 24 बॉलमध्ये 46 रनची खेळी केली. शोएब मलिक (Shoaib Malik) 14 रनवर नाबाद राहिला. वेस्ट इंडिजकडून हेडन वॉल्शने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या, तर रवी रामपॉलला एक विकेट घेण्यात यश आलं.
या सामन्यामध्ये वेस्ट इंडिजचा कर्णधार कायरन पोलार्ड (Kieron Pollard) याने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला होता. यानंतर पाकिस्तानच्या बॉलर्सनी सुरुवातीपासूनच वेस्ट इंडिजला धक्के दिले. वेस्ट इंडिजला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून फक्त 130 रनपर्यंत मजल मारता आली. हेटमायरने सर्वाधिक 28 रन केले, तर पोलार्डने 10 बॉलमध्ये 23 रनची आक्रमक खेळी केली.
वेस्ट इंडिजच्या टीमने आतापर्यंत सर्वाधिक 2 टी-20 वर्ल्ड कप जिंकले आहेत. 2012 आणि याआधी झालेला 2016 वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिजचा विजय झाला होता. यंदाही वेस्ट इंडिजची टीम वर्ल्ड कप जिंकण्यासाठीची प्रबळ दावेदार आहे, पण पाकिस्तानने पहिलाच सराव सामना जिंकत बलाढ्य वेस्ट इंडिजला धक्का दिला आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांचा सामना 24 ऑक्टोबरला होणार आहे. दोन्ही टीमसाठी यंदाच्या वर्ल्ड कपमधला हा पहिलाच सामना असेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Babar azam, Pakistan, T20 world cup, West indies