मुंबई, 15 जानेवारी : 7 वर्षांनंतर फास्ट बॉलर एस.श्रीसंत (S. Sreesanth) याने मैदानात पुनरागमन केलं आहे. सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेमध्ये श्रीसंत केरळच्या फास्ट बॉलिंगचं नेतृत्व करत आहे. मॅच फिक्सिंग प्रकरणाच्या 7 वर्षांनंतर श्रीसंत पहिल्यांदाच क्रिकेट खेळत आहे. बीसीसीआयने आयपीएलदरम्यान स्पॉट फिक्सिंग केल्याचा आरोप करत श्रीसंतवर बंदी घातली होती.
सय्यद मुश्ताक अली स्पर्धेच्या पहिल्या दोन मॅचमध्ये श्रीसंत जुन्या अवतारात आक्रमक दिसला. त्याने पुडुच्चेरीविरुद्ध बॅटिंग करताना फाबिद अहमदला आऊट स्विंगवर बोल्ड केलं. दुसऱ्या मॅचमध्ये मुंबईविरुद्ध श्रीसंतने जास्त रन दिल्या.
श्रीसंतवर लावण्यात आलेली बंदी मागच्यावर्षी सप्टेंबरमध्ये संपली. फिटनेस आणि अन्य मापदंडांसाठी त्याची केरळ राज्य क्रिकेट संघामध्ये निवड झाली आणि त्याला पुन्हा एकदा खेळण्याची परवानगी मिळाली. 37 वर्षांच्या श्रीसंतचं परत भारतीय टीमची जर्सी घालून मैदानात उतरण्याचं स्वप्न आहे. ईटीव्ही भारताला दिलेल्या मुलाखतीमध्ये केरळच्या टीमला रणजी आणि इराणी ट्रॉफी जिंकवणं आपलं लक्ष्य असल्याचं श्रीसंत म्हणाला आहे.
श्रीसंत सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत 369 क्रमांकाची जर्सी घालून खेळत आहे. याआधी तो 36 क्रमांकाची जर्सी घालून मैदानात उतरायचा. 'यावेळी मी 36 क्रमांकाची जर्सी घालण्याऐवजी 369 क्रमांकाची जर्सी घालत आहे, कारण माझी मुलगी श्रीसान्विकाचा जन्म 9 मे रोजी झाला. श्रीसान्विकाचा अर्थ लक्ष्मी आहे,' असं श्रीसंतने सांगितलं.
क्रिकेट खेळण्यावर बंदी घालण्याआधी श्रीसंतने 27 टेस्टमध्ये 87 विकेट आणि 53 वनडेमध्ये 75 विकेट घेतल्या आहेत. भारताने 2007 चा टी-20 वर्ल्ड कप आणि 2011 सालचा 50 ओव्हरचा वर्ल्ड कप जिंकला, या दोन्ही वर्ल्ड कपमध्ये श्रीसंत भारतीय टीममध्ये होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.