मुंबई, 2 मार्च : ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन स्टीव्ह वॉनं (Steve Waugh) टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीचं (Virat Kohli) कौतुक केलं आहे. स्टीव्ह वॉचा असा विश्वास आहे की, विराट कोहलीच्या वृत्तीमुळे टीमला प्रत्येक अडचणींशी लढा देण्याची सवय लावली आहे. याचमुळे ही टीम आता घाबरत नाही आणि प्रतिस्पर्ध्याला त्याच पद्धतीने उत्तर देते. वॉनं हा खुलासा आपली नवीन डॉक्यूमेंट्री 'कॅप्चरिंग क्रिकेट- स्टीव्ह वॉ इन इंडिया' यामध्ये केला आहे.
स्टीव्ह वॉने टीम इंडियाच्या विचारसरणीमध्ये बदल घडवून आणण्याचे श्रेय विराट कोहलीला दिले आहे. त्यानं सांगितलं की, 'मला कोहली यासाठी आवडतो कारण टीम इंडियाच्या बदललेल्या वृत्तीमागे तोच आहे. त्यानेच सोबत असलेल्या खेळाडूंमध्ये कठीण परिस्थितीत भीती बाळगू नये, अशी उत्कटता निर्माण केली. प्रत्येक गोष्टीचा सामना करण्याचं बळ दिलं आणि सांगितलं की कोणतेही ध्येय साध्य करता येतं. विराट कोहली आधुनिक काळातील हिरो आहे.'
द्रविडनं सांगितलं तरुण खेळाडूंमधील बदलाचं कारण
स्टीव्ह वॉ व्यतिरिक्त या डॉक्युमेंट्रीमध्ये टीम इंडियाचा माजी कॅप्टन राहुल द्रविडनं (Rahul Dravid) भारतातील तरुण क्रिकेटर्सच्या विचारांमध्ये आलेल्या बदलामागचं कारण सांगितलं आहे. द्रविडला असं वाटतं की, भारतीय तरुणांना असा विश्वास आहे की ते काहीही साध्य करु शकतात. त्यांच्याकडे नेहमीच समजूतदारपणा आणि क्षमता होती. ज्याला आता एका यंत्रणेचा पूर्ण पाठिंबा मिळत आहे आणि हीच यंत्रणा तरुण खेळाडूंच्या टॅलेंटला चांगल्या प्रकारे समोर आणत आहे.'
राहुल द्रविड निवृत्तीनंतर तरुण खेळाडूंचा शोध घेत आहे. तो अंडर-19 आणि इंडिया-ए टीमचा कोच राहिला आहे. सध्या तो बंगळुरुच्या नॅशनल क्रिकेट अकॅडमीचा (National Cricket Academy) प्रमुख आहे.
विराट भारताचा सर्वात यशस्वी टेस्ट कॅप्टन
विराट कोहली भारताचा सर्वात यशस्वी टेस्ट कॅप्टन आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने आतापर्यंत 59 पैकी 35 टेस्ट मॅच जिंकल्या आहेत. यामधील 22 टेस्ट मॅच देशात तर 13 परदेशात झाल्या आहेत. इंग्लंड विरुद्ध झालेल्या मागच्या टेस्ट मॅचमध्ये विजय मिळवत विराट कोहलीने महेंद्र सिंग धोनीचा (MS Dhoni) सर्वात जास्त टेस्ट मॅच जिंकण्याचा रेकॉर्ड मोडला होता. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतानं घरच्या मैदानावर खेळलेल्या 30 टेस्ट मॅचपैकी 21 मॅच जिंकल्या. तर 3 मॅच हरल्या आणि 6 मॅच ड्रॉ झाल्या होत्या. त्याचसोबत, विराटच्या नेतृत्वाखाली भारताने घरच्या मैदानावर आतापर्यंत 29 टेस्ट मॅच खेळल्या आहेत. यामधील 22 मॅच जिंकल्या आहेत. तर 2 मॅचमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला आणि 5 टेस्ट मॅच ड्रॉ झाल्या आहेत.
वॉ आणि कोहलीच्या कॅप्टनसीमध्ये खूप साम्य
अहमदाबाद टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडविरोधात (India vs England) मिळालेल्या विजयानंतर विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाचे माजी कॅप्टन स्टीव्ह वॉची देखील बरोबरी केली आहे. स्टीव्ह वॉने देखील घरच्या मैदानावर 29 पैकी 22 टेस्ट मॅच जिंकल्या होत्या. अनेक दिग्गजांचा असा विश्वास आहे की, कोहलीच्या कॅप्टनसीची शैली स्टीव्ह वॉ यांच्याप्रमाणे आहे. त्याची वारंवार तुलना वॉसोबत केली जात आहे.
जर आपण रेकॉर्डवर नजर टाकली तर ही गोष्ट बऱ्याच प्रमाणात सत्य असल्याचे दिसून येते. वॉने 57 टेस्ट मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले. यापैकी 40 टेस्ट मॅच जिंकल्या तर 9 मध्ये त्यांचा पराभव झाला. म्हणजे त्यांच्या नेतृत्वा दरम्यान 88 टक्के निकाल लागला. तर कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतानं 59 पैकी 35 टेस्ट मॅच जिंकल्या आहेत. तर 14 मॅचमध्ये पराभव झाला, म्हणजे 83 टक्के निकाल लागला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, India, Virat kohli