मुंबई, 28 ऑक्टोबर : भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड झालेल्या टीममध्ये सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) ला संधी देण्यात आलेली नाही, यावरुन वाद निर्माण झाला आहे. हरभजन सिंग याने निवड समितीने सूर्यकुमार यादवला संधी न दिल्याच्या निर्णयावर टीका केली होती. यानंतर आता भारताचे माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर (Dilip Vengsarkar) यांनी सूर्यकुमार यादवला वगळण्याचा नेमका हेतू काय आहे? याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी सौरव गांगुलीकडे केली आहे.
'सूर्याची भारतीय टीममध्ये निवड न झाल्याचं बघून मला धक्का बसला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड झालेली टीम बघता सूर्यकुमार यादव हा सध्या देशातल्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. सूर्याची तुलना सध्या भारतीय टीममधल्या सर्वोत्तम खेळाडूसोबत होऊ शकते. त्याने सातत्याने रनही केल्या आहेत. भारतीय टीममध्ये संधी मिळण्यासाठी त्याने आणखी काय करायला पाहिजे?', असा सवाल वेंगसरकर यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना विचारला.
'26 वर्ष ते 34 वर्ष हा बॅट्समनचा सर्वोत्तम काळ असतो. सूर्यकुमार यादव हा 30 वर्षांचा आहे आणि सध्या तो त्याच्या कारकिर्दीच्या उच्चांकावर आहे. जर फॉर्म आणि फिटनेस हा निवड होण्यासाठीचा मापदंड नसेल, तर मग नेमका नियम काय आहे? रोहित शर्मा दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियात जाणार नसेल, तर सूर्यकुमार यादवने मधली फळी मजबूत केली असती,' असं वेंगसरकर म्हणाले.
यंदाच्या आयपीएलमध्ये सूर्यकुमार यादवने 11 मॅचमध्ये 31.44 च्या सरासरीने आणि 148.94 च्या स्ट्राईक रेटने 283 रन केले आहेत, यामध्ये 2 अर्धशतकांचा समावेश आहे. मागच्या वर्षी विजय हजारे ट्रॉफीमध्ये सूर्याने 8 मॅचमध्ये 113 च्या सरासरीने 226 रन केले. सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेमध्ये त्याने 11 मॅचमध्ये 56 च्या सरासरीने आणि 4 अर्धशतकांच्या मदतीने 392 रन केले. देवधर ट्रॉफीमध्ये सूर्यकुमारने इंडिया-सी कडून खेळताना इंडिया ए विरुद्ध 29 बॉलमध्ये 72 रन केले होते.