मुंबई, 20 जून : भारतीय क्रिकेट टीमसाठी 20 जून हा खूप स्पेशल दिवस आहे. या दिवसाची भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly), राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि सध्याचा कर्णधार विराट कोहलीसोबत (Virat Kohli) खास नातं आहे, कारण याच दिवशी या तिघांनी टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं, फक्त वर्ष वेगळं होतं. योगायोग म्हणजे या तिघांनीही भारतीय टीमचं नेतृत्व केलं. कोहलीने आजच्याच दिवशी टेस्ट क्रिकेटमध्ये 10 वर्ष पूर्ण केली आहेत. 2011 साली 20 जूनला विराटने वेस्ट इंडिजविरुद्ध टेस्टमध्ये पदार्पण केलं होतं.
गांगुली आणि द्रविडनी 20 जून 1996 साली इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्समधून टेस्ट क्रिकेटमध्ये पहिलं पाऊल टाकलं. या सामन्यात दोघांनीही कायम लक्षात राहील, अशी खेळी केली. पहिल्याच सामन्यात गांगुलीने शतक केलं तर द्रविड 95 रन करून आऊट झाला. गांगुली भारताकडून पदार्पणात शतक करणारा 10 वा आणि लॉर्ड्सवर असं करणारा पहिला भारतीय बनला होता.
गांगुलीला 1996 सालच्या इंग्लंड दौऱ्यात मजबूत मधल्या फळीमुळे पहिल्या सामन्यात संधी मिळाली नव्हती. भारताच्या पराभवानंतर मात्र गांगुली लॉर्ड्सवर मैदानात उतरला. या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये गांगुली तिसऱ्या क्रमांकावर आला आणि 131 रन करून भारताला अडचणीतून बाहेर काढलं. गांगुलीने द्रविडसोबत सहाव्या विकेटसाठी 94 रनची महत्त्वाची पार्टनरशीप केली. यानंतरच्या पुढच्या टेस्टमध्ये गांगुलीने आणखी एक शतक केलं. भारताने ही सीरिज गमावली तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन नव्या चेहऱ्यांनी पदार्पण केलं, ज्यांनी पुढे इतिहास घडवला.
गांगुली 12 वर्ष आणि द्रविडने 16 वर्ष टेस्ट क्रिकेट खेळलं. गांगुलीने 113 टेस्टमध्ये 7,212 रन केले, यात 16 शतकं आणि 35 अर्धशतकं होती. तर द्रविडने 164 टेस्टमध्ये 52 च्या सरासरीने 13,288 रन केले. द्रविडला टेस्टमध्ये 36 शतकं आणि 63 अर्धशतकं करता आली. निवृत्तीनंतर गांगुली आता बीसीसीआयचा अध्यक्ष आहे, तर द्रविड श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय टीमचा प्रशिक्षक असेल. याआधी द्रविड इंडिया-ए आणि अंडर-19 टीमचा प्रशिक्षकही होता.
विराट कोहलीनेही 20 जूनलाच टेस्टमध्ये पदार्पण केलं, पण ते वर्ष होतं 2011. गांगुली आणि द्रविडप्रमाणे विराटचं पदार्पण धमाकेदार नव्हतं. वेस्ट इंडिजविरुद्ध किंग्सटन टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये तो 10 बॉल खेळून 4 रनवर आऊट झाला, तर दुसऱ्या इनिंगमध्ये त्याला 15 रन करता आले. तेव्हा तीन वर्षानंतर तो भारतीय टेस्ट टीमचा कर्णधार होईल, असं कोणालाही वाटलं नव्हतं.
विराटच्या नेतृत्वात भारताने सर्वाधिक टेस्ट जिंकण्याचा विक्रम केला आहे. विराट कर्णधार असताना भारताला 36 विजय मिळाले. धोनीच्या नेतृत्वात 27, गांगुली कर्णधार असताना 12 सामन्यात टीमला जिंकता आलं.
विराट कोहलीने 92 टेस्टच्या 154 इनिंगमध्ये 52 च्या सरासरीने 7,534 रन केले, यात 27 शतकं आणि 25 अर्धशतकांचा समावेश आहे. कर्णधार म्हणून विराट भारताचा सर्वाधिक रन करणारा खेळाडू आहे, तर जगात चौथ्या क्रमांकाचा आहे. कोहलीने कर्णधार असताना 99 इनिंगमध्ये 59 च्या सरासरीने 5,436 रन केले, यात 20 शतकं आणि 15 अर्धशतकं आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Rahul dravid, Sourav ganguly, Team india, Virat kohli