मुंबई, 28 जुलै: टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) हा सध्याचा जगातला सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे, यात कोणताच वाद नाही. रन-मशीन असण्यासोबतच विराट एक निडर आणि आक्रमक कर्णधारही आहे, जो पराभवाच्या मानसिकतेवर विश्वास ठेवत नाही. कोहलीच्या नेतृत्वात भारतीय टीमने आक्रमक रूप घेतलं आहे. कोहलीच्या याच नेतृत्वक्षमतेनं भारतीय टीमला मजबूत केलं आहे. विराट कोहली टीम इंडियाच्या सगळ्यात यशस्वी कर्णधारापैकी एक आहे, पण विराटच्या नेतृत्वाबाबत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर (Shoaib Akhtar) याचं वेगळं मत होतं.
कर्णधार झाल्यानंतरच्या दबावाचा विराट कोहलीच्या बॅटिंगवर विपरित परिणाम होईल, असं आपल्याला वाटत होतं, याबाबत आपण त्याची पत्नी अनुष्का शर्माला (Anushka Sharma) धोक्याचा इशाराही दिला होता, असं शोएब अख्तर म्हणाला.
'कर्णधार म्हणून विराट कोहलीने शानदार काम केलं आहे. सोनीच्या एका शोमध्ये बोलताना मी अनुष्का शर्मासोबत बोललो होतो, विराट कर्णधार होऊन चूक करत आहे. त्याच्यावर खूप दबाव आहे हे मला माहिती होतं, त्यामुळे त्याची कामगिरी ढासळण्याची भीती होती. तो खूप युवा आहे, त्यामुळे त्याला पहिले रन केले पाहिजे, त्याचा खेळ त्याला खेळून दिला पाहिजे, असं मला वाटत होतं,' अशी प्रतिक्रिया शोएब अख्तरने दिली.
मी चुकीचा सिद्ध झाल्यामुळे आनंदी आहे, असंही शोएब अख्तर म्हणाला. भारतीय टीमचं उत्कृष्ट नेतृत्व केल्याबद्दल शोएबने विराटचं कौतुकही केलं. मैदानात विराट एक फास्ट बॉलर आहे, जो इशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमारच्या रुपात खेळतो, अशी प्रतिक्रियाही शोएबने दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Anushka sharma, Cricket, Shoaib akhtar, Team india, Virat kohli