मुंबई, 9 जानेवारी : भारत आणि श्रीलंका यांच्यातल्या वनडे सीरिजला 10 जानेवारीपासून सुरूवात होत आहे. या सीरिजमध्ये पुन्हा एकदा टीम इंडियाचं नेतृत्व रोहित शर्माकडे आलं आहे. टी-20 वर्ल्ड कपमधल्या पराभवानंतर रोहित शर्माची कॅप्टन्सी चर्चेचा विषय ठरली होती. वर्ल्ड कपनंतर टी-20 फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्याने केलं. पांड्याच्या नेतृत्वात भारताने लागोपाठ दोन टी-20 सीरिज जिंकल्या.
हार्दिकला कर्णधार केल्यानंतर रोहित शर्माच्या टी-20 कर्णधारपदाबाबत प्रश्न उपस्थित केले गेले. हार्दिकला कर्णधार केल्यामुळे आता रोहित शर्माचं कर्णधारपद धोक्यात आल्याचंही बोललं गेलं. रोहित शर्माचं वाढतं वय आणि फिटनेसबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. पण श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सीरिजआधी रोहित शर्माने आपण टी-20 क्रिकेट खेळणार असल्याचं स्पष्ट केलं आहे, तसंच खेळाडूंना आराम गरजेचा असल्याचं मतही त्याने मांडलं.
वनडे सीरिजआधी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये रोहित शर्मा बोलत होता. 'बॅक टू बॅक मॅच खेळणं कोणासाठीही शक्य नाही. सगळ्या फॉरमॅटच्या खेळाडूंना आवश्यक ब्रेक देणं गरजेचं आहे, यात माझाही समावेश आहे. न्यूझीलंडविरुद्ध 3 टी-20 मॅच आहेत, काय होतं ते पाहूया. आयपीएलनंतर मी टी-20 क्रिकेट सोडण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही,' असं रोहित शर्माने स्पष्ट केलं.
बुमराह वनडे सीरिजमधून बाहेर
श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सीरिजमधून भारताचा स्टार बॉलर जसप्रीत बुमराह बाहेर झाला आहे. एनसीएमध्ये नेटमध्ये बॉलिंग करताना बुमराहला दुखापत झाल्याचं रोहित शर्माने सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rohit sharma, T20 cricket, Team india