मुंबई, 30 डिसेंबर : रवी शास्त्री (Ravi Shastri) टीम इंडियाचे प्रशिक्षक असताना परदेशामध्ये टीम इंडियाची कामगिरी उल्लेखनीय झाली, पण भारताला आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही. आता शास्त्रींच्या जागी राहुल द्रविड (Rahul Dravid) टीम इंडियाचा (Team India) मुख्य प्रशिक्षक झाला आहे. प्रशिक्षकपद सोडल्यानंतर शास्त्री यांनी टीम निवडीच्या नियमांमध्ये बदल करण्याची मागणी केली आहे. 2019 साली झालेल्या वर्ल्ड कपमध्ये (World Cup 2019) तीन विकेट कीपरना टीममध्ये संधी देण्यात आली होती, यावर रवी शास्त्री यांनी आधीच प्रश्न उपस्थित केले होते. आता त्यांनी टीम निवड करताना कर्णधार आणि कोच यांनाही संधी देण्यात यावी, असं मत रवी शास्त्री यांनी मांडलं आहे.
स्टार स्पोर्ट्सशी बोलताना रवी शास्त्री म्हणाले की कोच आणि कर्णधाराला त्यांचं मत मांडलं पाहिजे. 'अधिकृतरित्या टीम निवडीमध्ये कोच आणि कर्णधाराचा समावेश केला गेला पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे. खासकरून जेव्हा कोचकडे अनुभव असतो. मी होतो, राहुल द्रविड आहे, कर्णधारालाही त्याचं म्हणणं मांडून दिलं पाहिजे. वर्ल्ड कपमध्ये तीन विकेट कीपरच्या निवडीमुळे मी नाराज होतो, पण निवड समितीच्या कामात मी हस्तक्षेप केला नाही,' अशी प्रतिक्रिया शास्त्रींनी दिली.
2019 वर्ल्ड कपमध्ये तीन विकेट कीपरना संधी द्यायच्याऐवजी अंबाती रायुडू किंवा श्रेयस अय्यर यांना संधी मिळायला पाहिजे होती. एमएस धोनी (MS Dhoni), ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) या तिन्ही विकेट कीपरना टीममध्ये ठेवण्यात काय अर्थ होता? पण मी निवड समितीच्या कामात हस्तक्षेप केला नाही. जेव्हा मला फीडबॅक मागण्यात आला तेव्हाच मी दिला, असं वक्तव्य शास्त्रींनी केलं.
अंबाती रायुडू (Ambati Rayudu) वर्ल्ड कपआधी भारतीय टीममध्ये होता, पण अचानक त्याला वर्ल्ड कपच्या टीममधून बाहेर काढण्यात आलं. रायुडूऐवजी विजय शंकरला (Vijay Shankar) संधी देण्यात आली. रवी शास्त्रींच्या कार्यकाळात टी-20 वर्ल्ड कप भारताची अखेरची स्पर्धा होती, यातही टीमची कामगिरी निराशाजनक झाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ravi shastri, Team india