मुंबई, 11 मार्च : विराट कोहली (Virat Kohli) आणि बाबर आझम (Babar Azam) यांची तुलना होऊ शकत नाही. दोन्ही खेळाडू वेगळे आहेत, असं वक्तव्य पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू अब्दुल रझाकने (Abdul Razzaq) केलं आहे. तसंच पाकिस्तानमध्ये भारतापेक्षा जास्त प्रतिभावान खेळाडू आहेत, त्यामुळे दोन्ही देशांच्या खेळाडूंची तुलना होऊ शकत नाही, असं रझाक म्हणाला. ऑलराऊंडर असलेल्या रझाकने पाकिस्तानकडून 46 टेस्ट, 265 वनडे आणि 33 टी-20 मॅच खेळल्या.
क्रिकेट पाकिस्तानला मुलाखत देताना अब्दुल रझाक म्हणाला, 'बाबर आझम आणि विराट कोहलीची तुलना केली गेली नाही पाहिजे. तुम्ही भारतीय खेळाडूंची पाकिस्तानी खेळाडूंसोबत तुलना करू शकत नाही, पाकिस्तानकडे जास्त प्रतिभावान खेळाडू आहेत. इतिहास बघितला तर आपल्याकडे मोहम्मद युसूफ, इंजमाम उल हक, सईद अन्वर, जावेद मियांदाद, झहीर अब्बास आणि एजाज अहमद यांच्यासारखे महान खेळाडू होते. विराट आणि बाबर एकदम वेगळे खेळाडू आहेत. जर तुम्ही दोघांची तुलना करत असाल तर भारत-पाकिस्तान यांच्यात मॅच झाली पाहिजे. तेव्हाच कोण भारी आहे, ते कळेल.'
'विराट चांगला खेळाडू आहे, त्याने पाकिस्तानविरुद्ध चांगली कामगिरीही केली आहे. मी त्याच्याविरुद्ध नाही. पण जर भारतीय खेळाडू आपली तुलना पाकिस्तानी खेळाडूंशी करत नाहीत, तर आपणही तसं करता कामा नये. बाबर माझ्या नेतृत्वात स्थानिक क्रिकेटमध्ये 5-6 वर्ष खेळला. मी कधीच त्याला टीममधून बाहेर केलं नाही, कारण तो उत्कृष्ठ खेळाडू आहे. त्याने स्वत:ला सिद्ध केलं आणि आता तो जगातला नंबर एकचा बॅट्समन आहे. त्याची योग्य काळजी घेतली तर तो सगळी रेकॉर्ड मोडेल,' असं रझाक म्हणाला.
टेस्ट क्रिकेटमध्ये विराट कोहली पाचव्या आणि बाबर आझम सहाव्या क्रमांकावर आहे. वनडे क्रमवारीत कोहली पहिल्या आणि बाबर तिसऱ्या तर टी-20 मध्ये बाबर विराटच्या पुढे आहे. बाबर चौथ्या आणि विराट सहाव्या क्रमांकावर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराटने तिन्ही फॉरमॅटमध्ये 470 मॅच खेळल्या आहेत आणि 70 शतकं केली आहेत, तर बाबरच्या नावावर 155 मॅचमध्ये 17 शतकं आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Abdul razzaq, Babar azam, Cricket, India, Pakistan, Sports, Virat kohli