मुंबई, 5 ऑगस्ट : टीम इंडियाचा ऑलराऊंडर कृणाल पांड्या (Krunal Pandya) कोरोना व्हायरसमधून पूर्णपणे बरा झाला आहे, तसंच तो श्रीलंकेतून भारतात त्याच्या घरी परतल्यांच वृत्त आहे. श्रीलंका दौऱ्यावर असताना पहिल्या टी-20 नंतर कृणाल पांड्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. कृणालच्या संपर्कात आलेल्या 8 खेळाडूंनाही क्वारंटाईन करण्यात आलं होतं. आता पांड्या या व्हायरसला पूर्णपणे हरवून घरी परतला आहे.
श्रीलंका दौरा संपल्यानंतर टीम इंडियाचे इतर खेळाडू घरी परतले होते, पण कृणाल पांड्या श्रीलंकेतच आयसोलेशनमध्ये होता. कृणालसोबत आयसोलेट झालेल्या युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि कृष्णप्पा गौतम (Krishnappa Gowtham) यांची कोरोना टेस्टही पॉझिटिव्ह आली. याशिवाय पृथ्वी शॉ (Prithvi Shaw), मनिष पांडे (Manish Pandey), सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांनाही आयसोलेशनमध्ये जावं लागलं, त्यामुळे पृथ्वी आणि सूर्यकुमार यांना इंग्लंड दौऱ्यावर जायलाही उशीर झाला.
अखेरच्या दोन टी-20 मधून 9 खेळाडू बाहेर झाल्यामुळे टीम इंडियाकडे 11 खेळाडूच शिल्लक होते, त्यामुळे शेवटच्या दोन मॅचमध्ये टीमला फक्त 5 बॅट्समन घेऊन मैदानात उतरावं लागलं होतं. टीमचं संतुलन खराब झाल्यामुळे भारताचा अखेरच्या 2 सामन्यांमध्ये पराभव झाला, तसंच त्यांना सीरिजही 2-1 ने गमवावी लागली.
युझवेंद्र चहल आणि कृष्णप्पा गौतम अजून श्रीलंकेतच आहेत. हे दोन्ही खेळाडू त्यांची आरटी-पीसीआर टेस्ट निगेटिव्ह यायची वाट बघत आहेत. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार कृणाल पांड्या ज्या हॉटेलमध्ये राहिला होता, तिकडून निघाला आहे. बुधवारी सकाळी त्याने माऊंट लाविनिया हॉटेलमधून बाहेर पडून भारतासाठीचं विमान पकडलं. चहल आणि गौतम यांची गुरुवारी आरटी-पीसीआर टेस्ट होणार आहे. या टेस्टचे रिपोर्ट निगेटिव्ह आले तर त्यांनाही भारतात परतण्याची परवानगी मिळेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.