नवी दिल्ली : टीम इंडियासाठी वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये दोन कर्णधार असावेत, अशी मागणी अनेक क्रिकेट तज्ज्ञ आणि चाहते करत आहेत. रोहित शर्मा (Rohit Sharma) ने पाचव्यांदा मुंबई (Mumbai Indians) ला आयपीएल (IPL 2020) जिंकवून दिल्यानंतर ही मागणी जोर धरू लागली. रोहित शर्माला टी-20 टीमचं आणि विराट कोहलीकडे वनडे आणि टेस्ट टीमचं नेतृत्व द्यावं, असा सूर उमटू लागला. भारताचे माजी क्रिकेटपटू कपिल देव (Kapil Dev) यांनी मात्र ही मागणी योग्य नसल्याचं म्हणलं आहे. एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये दोन सीईओ असू शकत नाहीत, असं कपिल देव म्हणाले.
'आपल्या संस्कृतीमध्ये असं होऊ शकत नाही. तुम्ही एका कंपनीमध्ये दोन सीईओ ठेवता का? जर कोहली टी-20 खेळत असेल आणि तो चांगला असेल, तर त्यालाच कायम ठेवलं पाहिजे. पण इतर खेळाडूंनीही पुढे आलं पाहिजे. तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताची 70-80 टक्के टीम सारखी आहे. त्यांना वेगवेगळ्या विचाराचे कर्णधार पसंत नाहीत. जर तुम्ही दोन कर्णधार ठेवलेत तर खेळाडू असा विचार करू शकतात की तो माझा टेस्ट टीमचा कर्णधार आहे, त्यामुळे मी त्याला नाराज करणार नाही,' असं वक्तव्य कपिल देव यांनी एचटी लीडरशीप समिटच्या ऑनलाईन कार्यक्रमात केलं.
फास्ट बॉलरबाबत कपिल देव नाराज
फास्ट बॉलर खूप जास्त प्रयोग करत असल्याचं मत कपिल देव यांनी मांडलं. 'मी सध्याच्या फास्ट बॉलरबाबत खूश नाही. पहिलाच बॉल क्रॉस सीम असू शकत नाही. गतीपेक्षा स्विंग महत्त्वाचा आहे, हे बॉलरना समजलं पाहिजे, पण बॉलर या कलेपासून लांब जात आहेत. आयपीएलमध्ये नटराजन माझ्यासाठी हिरो आहे. त्या युवा बॉलरने न घाबरता यॉर्कर टाकले,' अशी प्रतिक्रिया कपिल देव यांनी दिली.
'जर तुम्हाला बॉल स्विंग करता येत नसेल, तर तुम्ही करत असलेले प्रयोग बेकार आहेत. आपले फास्ट बॉलर शानदार आहेत. शमी, बुमराहकडे बघा. आज आपण आपल्या फास्ट बॉलवर अवलंबून आहोत, हे ऐकून आनंद होतो. आपले फास्ट बॉलर मॅचमध्ये 20 विकेट घेऊ शकतात. भारताकडे आधी कुंबळे आणि हरभजन सिंग होते. आज कोणत्याही देशाला उसळणाऱ्या खेळपट्ट्या नको असतात,' असं कपिल देव यांनी सांगितलं.