पुणे, 29 मार्च : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात मागच्या 52 दिवसांमध्ये 4 टेस्ट, 5 टी-20 आणि 3 वनडे मॅचची सीरिज खेळवली गेली. या तिन्ही सीरिजमध्ये भारताचा विजय झाला. या निकालांमुळे फक्त भारतीय टीमच खूश नसेल तर आयपीएलच्या (IPL 2021) चार टीमनाही या निकालामुळे दिलासा मिळाला आहे. आयपीएलच्या यंदाच्या मोसमाला 9 एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. त्याआधी या चार टीमकडून खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंनी इंग्लंडविरुद्ध दमदार कामगिरी केली आहे.
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचं (RCB) प्रतिनिधीत्व करेल. इंग्लंडविरुद्धची पहिली टेस्ट गमावल्यानंतर विराटच्या नेतृत्वात भारताने पुढच्या तिन्ही टेस्ट जिंकल्या. याचसोबत टी-20 सीरिजमध्ये 3-2 ने आणि वनडे सीरिजमध्ये 2-1 ने विजय मिळवला. इंग्लंडविरुद्धच्या दौऱ्यात विराटला एकही शतक करता आलं नसलं, तरी त्याने 12 मॅचच्या 14 इनिंगमध्ये 532 रन केले. कोहलीने शतक केलं नसलं तरी या दौऱ्यातला तो सर्वाधिक रन करणारा खेळाडू होता. त्याने या 14 इनिंगमध्ये 7 अर्धशतकंही केली. नाबाद 80 रन त्याचा सर्वाधिक स्कोअर होता.
मुंबई इंडियन्स
इंग्लंडविरुद्धच्या या दौऱ्यानंतर सगळ्यात जास्त खूश मुंबईची (Mumbai Indians) टीम असेल, कारण रोहित शर्मा (Rohit Sharma), सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav), इशान किशन (Ishan Kishan), कृणाल पांड्या (Krunal Pandya) आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांनी चमकदार कामगिरी केली. सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांनी आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच आक्रमक अर्धशतकी खेळी केली, तर कृणाल पांड्याने त्याच्या पहिल्याच वनडेमध्ये अर्धशतक केलं. हार्दिक पांड्या बॅटिंग आणि बॉलिंगमध्येही चमकला. तर मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा विराटनंतर सर्वाधिक रन करणारा खेळाडू ठरला.
रोहितने टेस्ट, टी-20 आणि वनडे मिळून 10 मॅच खेळल्या, यातल्या 13 इनिंगमध्ये त्याने 526 रन केल्या, म्हणजेच रोहित विराटपेक्षा फक्त 6 रन मागे राहिला. इंग्लंडविरुद्धच्या तिन्ही सीरिजमध्ये रोहितने एक शतक आणि दोन अर्धशतकंही लगावली. वनडे सीरिजमध्ये रोहित तिन्ही मॅचमध्ये ओपनिंगला खेळला, यातल्या एका मॅचमध्ये त्याने 50 रनची आणि एका मॅचमध्ये 100 रनची पार्टनरशीप केली. या दोन्ही मॅचमध्ये भारताचा विजय झाला. एवढंच नाही तर इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टी-20 मध्ये शेवटच्या चार ओव्हरमध्ये कोहलीऐवजी रोहितने टीमची कॅप्टन्सी केली आणि हरलेल्या सामन्यात भारताला विजय मिळवून दिला, त्यामुळे भारताने सीरिजमध्ये 2-2 ने बरोबरी केली.
टेस्ट सीरिजमध्ये जो रूटच्या 368 रननंतर रोहितने सर्वाधिक 345 रन केले. आयपीएलमध्ये रोहित मुंबईचं नेतृत्व करणार आहे, त्याआधी मुंबईने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 साली आयपीएल ट्रॉफी जिंकली.
पंजाब किंग्जचा कर्णधार फॉर्ममध्ये
इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये केएल राहुलला (KL Rahul) संघर्ष करावा लागला. 4 मॅचमध्ये राहुलला फक्त 15 रन करता आले, यातल्या दोन सामन्यांमध्ये तर तो शून्य रनवर आऊट झाला. पण वनडे सीरिजमध्ये मात्र तो फॉर्ममध्ये आला. तीन सामन्यांमध्ये त्याने 88 च्या सरासरीने 177 रन केले, यात एक शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश होता. आयपीएलआधी पंजाबच्या (Punjab Kings) कर्णधाराला सूर गवसल्यामुळे त्यांच्या टीमलाही दिलासा मिळाला असेल.
दिल्ली कॅपिटल्स
भारत-इंग्लंड सीरिजचा सगळ्यात मोठा फटका दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) टीमला बसला, कारण त्यांचा कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) खांद्याच्या दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर झाला. पण दिल्लीकडूनच खेळणाऱ्या ऋषभ पंतने (Rishabh Pant) धडाकेबाज कामगिरी केली. दौऱ्यातल्या 11 मॅचच्या 12 इनिंगमध्ये पंतने 48 च्या सरासरीने 527 रन केले. पंतने या दौऱ्यात एक शतक आणि 4 अर्धशतकं केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, India vs england, IPL 2021