मुंबई, 19 एप्रिल : आयपीएलमध्ये (IPL) बरेच वेळा खेळाडूंमध्ये वादावादी पाहायला मिळते. भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यामध्ये कधीच मागे नसतो. मॅच जिंकण्यासाठी विराट पूर्ण जोर लावतो, तसंच संधी मिळताच तो विरोधी खेळाडूचं स्लेजिंगही करतो. दोन वर्षांपूर्वी झालेल्या आयपीएलमध्येही असंच झालं होतं. तेव्हा सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि विराट कोहली एकमेकांना भिडले होते. त्यादिवशी मैदानात नेमकं काय झालं होतं, याचा खुलासा आता सूर्यकुमार यादवने केला आहे.
सूर्यकुमारने ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन या शोमध्ये विराट कोहलीसोबत घडलेला घटनाक्रम सांगितला. 'विराट कोहलीची स्वत:ची स्टाईल आहे, त्याची एनर्जी लेव्हल आहे, जी वेगळ्याच स्तरावर असते. ती मॅच दोन्ही टीमसाठी महत्त्वाची होती, त्यामुळे विराटचं स्लेजिंगही वेगळ्या प्रकारचं होतं, पण माझा फोकस माझ्या खेळावरच होता. काहीही झालं तरी लक्ष विचलित होऊन द्यायचं नाही, कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या टीमला मॅच जिंकवून द्यायची, हे मी ठरवलं होतं,' असं सूर्यकुमार म्हणाला.
This video has a separate fan base #SuryakumarYadav #ViratKohli#RCBvsMI #Rohit pic.twitter.com/e4XA6chGYt
— अंकीत™ (@Mr_Ankki) April 9, 2022
'मी शॉट मारला आणि बॉल विराटजवळ गेला, यानंतर तो चालत माझ्याजवळ आला आणि मला खून्नस द्यायला लागला. ही त्याची नैसर्गिक प्रतिक्रिया होती. मी च्युईंग गम चघळत होतो. समोरचा खेळाडू माझ्यावर चाल करून येत आहे, हे पाहून माझ्या हृदयात धडधडायला लागलं. तो काहीही म्हणाला नाही आणि मी देखील काहीच बोललो नाही. काहीही झालं तरी काहीच बोलायचं नाही, हे मी ठरवलं होतं. फक्त 10 सेकंद आणि मग पुढची ओव्हर सुरू होईल. संपूर्ण मॅच संपेपर्यंत मी त्याला बघितलं नाही,' असं वक्तव्य सूर्याने केलं.
Surya Kumar Yadav about Virat Kohli during 2020 IPL match between MI and RCB pic.twitter.com/jtTI4nlhM9
— Himanshu (@18poonia) April 19, 2022
सूर्याने मुंबईला जिंकवलं
आयपीएल 2020 साली झालेल्या त्या सामन्यात आरसीबीने पहिले बॅटिंग करत 164 रन केले, या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबईच्या (Mumbai Indians vs RCB) दोन विकेट लवकर गेल्या होत्या. सूर्यकुमारने 43 बॉलमध्ये नाबाद 79 रन करून मुंबईला 5 विकेटने जिंकवलं. 2020 साली रोहितच्या नेतृत्वात मुंबईने धमाकेदार कामगिरी केली आणि पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली.
या मोसमात मुंबईची कामगिरी निराशाजनक झाली आहे, पण सूर्याची बॅट तळपत आहे. 4 मॅचमध्ये त्याने 2 अर्धशतकं ठोकली आहेत. यावर्षी मुंबईने पहिल्या 6 मॅच गमावल्या आहेत, त्यामुळे त्यांचं प्ले ऑफला पोहोचणं जवळपास अशक्य आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ipl 2022, Mumbai Indians, RCB, Suryakumar yadav, Virat kohli