नवी दिल्ली, 30 मार्च : गेल्या 6 महिन्यांपासून धमाकेदार फॉर्ममध्ये असलेल्या ऋषभ पंत (Rishabh Pant) याला आयपीएलमध्ये (IPL 2021) दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) टीमचं नेतृत्व देण्यात आलं आहे. श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) दुखापत झाल्यामुळे ऋषभ पंत याला ही जबाबदारी देण्यात आली आहे. डावखुरा आक्रमक खेळाडू असलेल्या पंतने ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिज जिंकण्यात, इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये विजय मिळवण्यात तसंच इंग्लंडविरुद्धची वनडे आणि टी-20 सीरिज खिशात टाकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात पुण्यात झालेल्या पहिल्या वनडेमध्ये फिल्डिंग कताना श्रेयस अय्यरला दुखापत झाली होती. फोर अडवताना तो खांद्यावर पडला होता. दुखापत गंभीर असल्यामुळे अय्यर सीरिजमधून बाहेर झाला होता. 8 एप्रिलला श्रेयस अय्यरवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शस्त्रक्रियेनंतर श्रेयस अय्यर कमीत कमी चार ते पाच महिने क्रिकेटपासून लांब राहू शकतो, त्यामुळे अय्यर संपूर्ण आयपीएल खेळणार नाही, म्हणून ऋषभ पंतला दिल्लीने कर्णधार बनवलं.
दिल्लीच्या कर्णधारपदी निवड झाल्यानंतर ऋषभ पंत याने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 'दिल्लीमध्येच मी लहानाचा मोठा झालो. 6 वर्षांपूर्वी इकडूनच माझ्या आयपीएलच्या प्रवासाला सुरूवात झाली. या टीमचं नेतृत्व करणं माझं स्वप्न होतं. टीमच्या मालकांनी या भूमिकेसाठी मला योग्य समजलं, त्याबद्दल त्यांचे आभार. सर्वोत्तकृष्ट प्रशिक्षक आणि वरिष्ठ खेळाडूंसोबत मी दिल्लीसाठी सर्वोत्तम कामगिरी करायला तयार आहे,' असं पंत म्हणाला.
दुसरीकडे श्रेयस अय्यर यानेही ऋषभ पंतचं अभिनंदन केलं आहे. दिल्लीचं नेतृत्व करण्यासाठी ऋषभ पंत हा योग्य खेळाडू आहे. जेव्हा मला दुखापत झाली तेव्हा दिल्लीला या मोसमात नेतृत्वाची गरज होती. पंत या कामासाठी योग्य आहे. तो या टीमसोबत उत्तम कामगिरी करेल, अशा शुभेच्छा मी देतो. मला टीमची आठवण येईल, असं श्रेयस अय्यरने सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Delhi capitals, IPL 2021, Rishabh pant, Shreyas iyer