मुंबई, 30 जुलै : आयपीएलच्या 14 व्या मोसमाच्या दुसऱ्या सत्राला (IPL 2021) 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये (UAE) सुरुवात होणार आहे. यासाठी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने (RCB) बीसीसीआयपुढे (BCCI) विनंती केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या एडम झम्पाऐवजी (Adam Zampa) श्रीलंकेचा लेग स्पिनर वानिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) याला बदली खेळाडू म्हणून परवानगी देण्यात यावी, अशी मागणी आरसीबीने बीसीसीआयकडे केली आहे. पीटीआयने याबाबतचं वृत्त दिलं आहे. श्रीलंकेचा लेग स्पिनर वानिंदू हसरंगा याने भारताविरुद्धच्या सीरिजमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. हसरंगाने त्याच्या स्पिनने भारतीय बॅट्समनना बराच त्रास दिला. हसरंगाची ही कामगिरी बघून आरसीबी आणि त्यांचा कर्णधार विराट कोहली चांगलेच खूश झाले.
वानिंदू हसरंगाने भारताविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये 7 विकेट घेतल्या. सीरिजमधला तो सर्वोत्तम बॉलर ठरला, तसंच त्याने अनेकांचं लक्षही वेधून घेतलं.
एडम झम्पा आणि केन रिचर्डसन (Kane Richardson) यांनी आयपीएल सुरू असतानाच वैयक्तिक कारणं देऊन माघार घेतली. ऑस्ट्रेलियात पोहोचल्यानंतर एडम झम्पाने आयपीएलचं बायो-बबल सुरक्षित नसल्याचं वक्तव्य केलं होतं.
काही खेळाडू आणि सपोर्ट स्टाफना कोरोनाची लागण झाल्यानंतर भारतातली आयपीएल स्पर्धा रद्द करण्यात आली. आता युएईतल्या अबु धाबी, शारजाह आणि दुबईमध्ये 19 सप्टेंबरपासून आयपीएलला पुन्हा एकदा सुरुवात होईल. आयपीएलचे उरलेले 31 सामने युएईमध्ये खेळवले जातील. लागोपाठ दोनवेळा स्पर्धा युएईमध्ये खेळवण्याची ही पहिलीच वेळ आहे. मागच्या वर्षीही कोरोना व्हायरसमुळे आयपीएल युएईमध्येच झाली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: IPL 2021, RCB, Virat kohli