मुंबई, 30 सप्टेंबर : आयपीएल 2021 चा दुसरा राऊंड (IPL 2021) आता अखेरच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे, पण अजूनही कोणतीच टीम प्ले-ऑफमध्ये क्वालिफाय झालेली नाही. काही टीम प्ले-ऑफमध्ये (IPL Play Offs) पोहोचण्याच्या अगदी जवळ पोहोचल्या आहेत, तर काहींमध्ये तगडी स्पर्धा सुरू आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा (Aakash Chopra) याने कोणत्या चार टीम प्ले-ऑफमध्ये प्रवेश मिळवतील, याबाबतचं भाकीत वर्तवलं आहे. चेन्नई सुपरकिंग्स (CSK) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) या दोन टीम नक्कीच प्ले ऑफमध्ये प्रवेश करतील, असं आकाश चोप्रा म्हणाला आहे. तसंच विराट कोहलीची आरसीबी (RCB) प्ले-ऑफमध्ये पोहोचणारी तिसरी टीम असेल, असं त्याला वाटतं.
मुंबई इंडियन्सना (Mumbai Indians) आयपीएलच्या यंदाच्या मोसमात सूर गवसला नाही. दुसऱ्या राऊंडमध्ये मुंबईने पहिले तीन सामने गमावल्यानंतर पंजाब किंग्सविरुद्ध त्यांचा विजय झाला. चौथ्या क्रमांकासाठी मुंबई आणि कोलकाता (KKR) यांच्यात चुरस असेल, असं आकाश चोप्रा म्हणाला.
'यंदा मुंबईऐवजी कोलकाता प्ले-ऑफमध्ये क्वालिफाय होईल, असं दिसतंय कारण मुंबई नेहमीसारखी टीम दिसत नाही. पंजाबविरुद्ध त्यांचा विजय झाला असला तरी तो विजय सहज नव्हता. आता मुंबईचा सामना दिल्लीविरुद्ध होणार आहे. या सामन्यात मुंबईचा पराभव झाला, तर त्यांच्यासाठी परिस्थिती आणखी कठीण होईल. दुसरीकडे कोलकाता त्यांच्या खाली असणाऱ्या टीमविरुद्ध खेळणार आहे,' असं वक्तव्य आकाश चोप्राने केलं.
आयपीएल पॉईंट्स टेबलची स्थिती
आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये चेन्नई पहिल्या आणि दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नईने 10 पैकी 8 मॅच जिंकल्या तर दिल्लीला 11 पैकी 8 मॅच जिंकता आल्या आहेत. या दोन्ही टीमच्या खात्यात 16 पॉईंट्स असल्यामुळे त्यांचं प्ले-ऑफमध्ये पोहोचणं जवळपास निश्चित आहे. तर आरसीबीने 11 पैकी 7 मॅच जिंकल्यामुळे त्यांच्या खात्यात 14 पॉईंट्स आहेत. पॉईंट्स टेबलची विराटची टीम तिसऱ्या क्रमांकावर आहे.
कोलकाता आणि मुंबईकडे 10 पॉईंट्स आहेत, या दोन्ही टीमनी 11 मॅच खेळल्या आहेत, पण कोलकात्याचा नेट रन रेट मुंबईपेक्षा चांगला असल्यामुळे ते चौथ्या आणि मुंबई पाचव्या क्रमांकावर आहे.
पंजाब (Punjab Kings) आणि राजस्थान (Rajasthan Royals) यांचं प्ले-ऑफमध्ये खेळण्याचं स्वप्न धूसर आहे, कारण या दोन्ही टीमनी 11 पैकी 4 सामने जिंकल्यामुळे त्यांच्याकडे 8 पॉईंट्स आहेत. उरलेल्या तिन्ही सामन्यांमध्ये त्यांचा विजय झाला तरी त्यांचे 14 पॉईंट्स होतात, या परिस्थितीमध्ये त्यांना इतर टीमच्या कामगिरीवर अवलंबून राहावं लागणार आहे. सनरायजर्स हैदराबादची (SRH) टीम आधीच प्ले-ऑफच्या रेसमधून बाहेर झाली आहे. हैदराबादने या मोसमात 10 पैकी फक्त 2 मॅच जिंकल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: IPL 2021, KKR, Mumbai Indians