दुबई, 09 ऑक्टोबर : किंग्स इलेव्हन पंजाबच्या (Kings XI Punjab) सलग पराभवामुळे अडचणीत आलेला असताना दुसरीकडे स्फोटक फलंदाज ख्रिस गेलला (Chris Gayle) यंदाच्या आयपीएलमध्ये एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळालेली नाही. याबाबत प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. सनरायझर्स हैदराबादविरोधात पाचवा सामाना गमावल्यानंतर आता प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी पंजाबला पुढील सर्व सामने जिंकावे लागणार आहेत.
ख्रिस गेल हा आयपीएलमधील सर्वाधिक स्फोटक फलंदाज म्हणून परिचित आहे.एका सामन्यात 175 धावा सर्वाधिक 356 षटकार, असे नानाविध विक्रम या एकट्या फलंदाजाच्या नाववर आहेत. मात्र, आयपीएल 2020 मध्ये सहा सामने होऊन गेले तरी त्याला संधी मिळालेली नाही त्यामुळे आता त्याला बाहेर का ठेवले जात आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
वाचा-IPL मध्ये थर्ड अम्पायरचा निर्णय फलंदाजाला अमान्य, DRS वरच घेतला DRS
अनिल कुंबळेने सांगितलं कारण
ख्रिस गेलला हैदराबादविरूद्धच्या सामन्यात बाहेर का ठेवले याबत पंजाबचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी म्हटले आहे की, या सामन्यात ख्रिस गेलला खेळवणार होतो, पण दोन दिवसांपासून त्याची तब्येत खराब आहे. त्याला फूड पॉयझनिंग झालं आहे. त्यामुळे तो या सामन्यात खेळू शकला नसल्याचे कुंबळे यांनी स्पष्ट केलं आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या या सामन्यात पंजाबचा मोठा पराभव झाला आहे. हैदराबादनी दिलेलं 202 धावांचं आव्हान पंजाबला पार करता आलं नाही. सुरुवातीपासून फलंदाजांची दमछाक झाल्याचं चित्र होतं. त्यात पुरन याने एकट्याने लढा दिला मात्र, त्याला कोणीही साथ दिली नाही. अखेर पंजबाचा या 69 धावांनी सामन्यात पराभव झाला.
वाचा-6 सामन्यातच IPL 2020 मधून बाहरे पडला 'हा' संघ! प्ले ऑफमध्ये जागा मिळवणं अशक्य
पंजाबच्या अडचणी वाढल्या
किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार के. एल. राहुल याने आरसीबी विरोधात धडाकेबाज 132 धावा केल्या होत्या. मात्र, त्यानंतर त्याला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. मयंक अग्रवालही चमक दाखवू शकलेला नाही. त्यामुळे ख्रिस गेलवर पंजाबच्या आशा लागून आहेत. गेल 41 वर्षांचा असून आता त्याची खेळी तेवढी आक्रमक नसली तरी तो संघात आहे हे कळाल्यावरच समोरच्या टीमवर दबाव येतो, त्यामुळे तो संघात कधी येतो याकडे सर्वांचं लक्ष आहे. दुसरीकडे पंजाबला आता आयपीएलमध्ये टिकायचं असेल तर सर्वच सामने जिंकावे लागणार आहेत. कारण ते सहा पैकी पाच सामन्यात पराभूत झाले असून गुणतक्त्यात सर्वांत शेवटी आहेत. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.